प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनामध्ये अनेक घटकांसमोर जगण्याचेच प्रश्न निर्माण झाले. अशा घटकांचे मनोबल वाढवून अभावामध्ये कसे जगायचे, याचे शिक्षण एकल अभियानांतर्गत खानापूर परिसरातील दुर्गम भागातील जनतेला विशेषतः महिलांना देण्यात आले. गावातील उत्पादन आणि सुविधा यांचा उपयोग करून घेऊन गावातच रोजगार निर्माण करण्यासाठी एकल अभियान प्रयत्नशील आहे, अशी माहिती डॉ. वैशाली केळुसकर यांनी दिली.
जायंट्स क्लब ऑफ सखीतर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ. वैशाली कित्तूर यांचा आगरकर रोडवरील एकलच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या, गावागावातील महिलांना एकलतर्फे आरोग्याचे प्राथमिक शिक्षण देण्यात येते. लॉकडाऊनच्या काळात या शिक्षणाचा उपयोग झाला. एकलने या महिलांना बीपी, शुगर, हिमोग्लोबीन तपासण्यासाठी उपकरणे दिली आहेत. प्रशिक्षण दिले आहे. या महिला घरोघरी जाऊन ही तपासणी करतात. त्याच्यासाठी अत्यंत क्षुल्लक असे शुल्क आकारले जाते. त्यामुळे महिलासुद्धा अर्थार्जन करून अभावामध्ये आपले कुटुंब चालवू शकते.
लॉकडाऊनमुळे आपल्या गावी असंख्य तरुण परतले आहेत. ते आता कामाची याचना करत आहेत. यासाठी एकलने जमीन घेतली असून या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. रानातील रानभाज्या काढून विकणे, मध काढून विकणे, गांडूळ खत तयार करून विक्री करणे, सेंद्रिय गूळ तयार करणे, असे लहान-लहान उद्योग या महिला करत असून एकलने अशा अनेक महिलांचे सबलीकरण केले आहे, असे त्या म्हणाल्या.
जायंट्स फेडरेशनच्या संचालिका ज्योती अनगोळकर यांनी डॉ. वैशाली यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांना आम्ही सहकार्य करू व जमेल तसे कार्य शहरात करू, अशी ग्वाही दिली. यावेळी सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, सचिव शीतल पाटील, खजिनदार लता कंग्राळकर, उपाध्यक्ष चंदा चोपडे, विद्या सरनोबत आणि कार्यकारिणीच्या हस्ते डॉ. वैशाली यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.