राशिवडे / प्रतिनिधी
जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेली आहे असा मकरंद अनासपुरे यांचा चित्रपट पहिला होता.. एवढंच काय विहीर वाहून जातानाचे व्हीडीओ आपण सोशलमिडीयावर पाहिलेत. पण राशिवडे (ता. राधानगरी) येथे अस्तित्वात असणारी सार्वजनिक स्वच्छता गृह(मुतारी) अज्ञातानी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन ती जमीनदोस्त केल्याची घटना राशिवडे येथे घडली. अन् मुतारी चोरीला गेल्याची खुमासदार चर्चा सोशलमिडीयावर व ग्रामस्थांत आज दिवसभर रंगली.
राशिवडे राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे व बाजरपेठेचे गांव म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावांत ग्रामपंचायत येथे एक व हनुमान मंदिर येथे अशा दोनच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृह(मुतारी) आहेत. शुक्रवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या लोकांना या स्वच्छता गृहाचा आधार होता. अशातच आज हनुमान मंदिर येथे असणारे सार्वजनिक स्वच्छता गृह अज्ञात व्यक्तांनी रात्रीच्या अंधारात पाडली व साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. ही घटना सकाळी उघडकीस आली. यावेळी सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच रंगराव चौगले, ग्रामविकास अधिकारी विराज गणबावले माजी सरपंच सागर धुंदरे, यांनी या ठिकाणाचा पंचनामा केला यात सुमारे तीन लाख रुपये मालमत्तेचे नुकसान झाले असून अज्ञात व्यक्ती विरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
यावेळी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाला ज्याठिकाणी हे स्वचता गृह (मुतारी) होते त्याच ठिकाणी बांधावे व तर महिलांना स्वतंत्र स्वच्छता गृह नसल्यामुळे कुचंबणा होत आहे. त्यामुळे महिलांसाठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छता गृह बांधावे अशी मागणी करण्यात आली.