केरळच्या या गावातील रहस्य जाणून घेण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न
जगात अनेक अजब घटना घडत असतात. या घटना इतक्या विचित्र असतात की त्याबद्दल ऐकल्यावर प्रथम विश्वासच बसत नाही. बहुतांश मुलं जुळी जन्माला येणारे एक ठिकाण आहे. हे ठिकाण केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्हय़ाच्या कोडिन्ही गावात आहे. गावाच्या या अनोखेपणाची चर्चा मागील काही काळापासून देशातच नव्हे तर जगभरात केली जात आहे. अनेक लोक येथील जुळय़ा लोकांना पाहण्यासाठी लांबून येत या गावात येत असतात. गावातील बहुतांश कुटुंबांमध्ये जुळय़ा मुलांनीच जन्म घेतला आहे. अखेर या गावात इतकी जुळी मुलं का जन्माला येतात याची पडताळणी करण्यासाठी अनेकदा वैज्ञानिकांचे पथक येथे दाखल झाले, पण त्यांना या रहस्यावरील पडदा दूर करण्यास यश मिळाले नाही.
या गावावर ईश्वराची विशेष कृपा असल्यानेच बहुतांश मुलं जुळी जन्माला येत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मागील 50 वर्षांदरम्यान या गावात 300 हून अधिक जुळय़ा मुलांनी जन्म घेतला आहे. गावाचा आश्चर्यजनक पैलू मागील काही काळापासून प्रसिद्धी मिळवित आहे.
कोडिन्ही गावात गेल्यास तुमची भेट मोठय़ा संख्येतील जुळय़ा लोकांशी होणार आहे. काही अनुमानांनुसार या गावात सुमारे 400 जुळी लोक राहतात. या गावात जुळी मुलं जन्माला येण्यासंबंधीच्या रहस्याची उकल करण्यासाठी 2016 मध्ये एक पथक पोहोचले होते. या पथकाने गावातील जुळय़ा लोकांचे नमुने गोळा केले होते. पण या संशोधनानंतरही कुठलाच ठोस निष्कर्ष निघाला नाही. तज्ञांनी या गावात राहणाऱया लोकांचा आहार, राहणीमान याबद्दलही सखोल अध्ययन केले, तरीही त्यांच्या हाती काहीच लागू शकले नाही.