पूरग्रस्त समितीच्या पहिल्याच बैठकीत 60 गावांतील सरपंच, सदस्यांची उपस्थिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापुरानंतर नुकसानीचे पंचनामे होतात, निवेदने दिली जातात, पण पाऊस संपताच सारं तिथंच रहाते. पण आता पूरग्रस्त समिती पुरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करेल. पुराला कारणीभुत ठरणार्या घटकांचा अभ्यास चौकशी समितीने करावा, पुनर्वसन नको, पुरानंतरच्या पाणीप्रश्नावर पर्याय शोधा, अशा मागण्या करत नदी, नाले, पाणंदीतील अतिक्रमणे महापुराला कारणीभूत असल्याचे मत पुरग्रस्त भागातील सरपंच सदस्यांनी नोंदवले. जिल्हा, परिषद, पंचायत समिती सदस्यांची 15 जणांची पुरग्रस्त समिती स्थापन करावी. त्यांनी गावागावात पुरग्रस्त समिती स्थापन करावी, असा निर्णय गुरूवारी घेण्यात आला.
महापुरानंतर शेतीसह अन्य नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तीनशेहून अधिक गावे पुरबाधित झाली आहेत. पुरबाधित गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरग्रस्त समिती स्थापन झाली आहे. समितीची पहिली बैठक गुरूवारी दसरा चौकातील शहाजी कॉलेजमध्ये झाली. बैठकीला साठहून अधिक पुरबाधित गावांतील सरपंच, सदस्य उपस्थित होते.
बाजीराव खाडे यांनी पुरग्रस्त समितीचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, महापुरानंतर चौकशी समिती स्थापन झाली आहे. पण या समितीत पुरग्रस्तांचा सदस्य असणे आवश्यक आहे. भविष्यात पुन्हा पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही पुरग्रस्त समिती पाठपुरावा करणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी पुरबाधीत गावागावांत अशा समित्या स्थापन कराव्यात, याद्वारे प्रशासनावर एक दबाव गट निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रयाग चिखलीतील गोकुळचे संचालक एस. आर. पाटील यांनी महापुरात पर्यायी मार्गाची मागणी केली. लाटवडेचे सरपंच संभाजी पवार यांनी पुरस्थितीची कारणे शोधा, महापुरानंतर निर्माण होणार्या पाणीप्रश्नावर पर्याय शोधा, सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची भुमिका घ्या, असे मत मांडले. साबळेवाडीच्या नामदेव पाटील यांनी आम्हाला पुनर्वसन नको, पर्यायी मार्ग सुचवा, असे सांगितले. सरपंच सागर पाटील यांनी पुरग्रस्त गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव करून आंदोलनाचा निर्णय घ्यावा, पहिले आंदोलन करा, मग भुमिका घ्या, असे स्पष्ट केले.
पट्टणकोडोली सरपंचांनी ऊसशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात गाळ साचल्याने ऊस पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे कारखान्यांचा हंगाम सुरू होताच हा ऊस प्राधान्याने तोडावा, अशी मागणी केली. पुराला कारणीभुत भराव ठरत आहे, त्यामुळे भरावविरहीत पुल उभारावेत, अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या अभ्यास समितीत पुरग्रस्त गावांचा सदस्य असावा, अशीही मागणी पुढे आली. बैठकीत 15 सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला बुवाचे वठार तर्फ उदगाव, बुवाचे वठार, लाटवडे, पाडळी बुद्रुक, साबळेवाडी, महे, भामटे, म्हारूळ, शिंगणापूर, नागदेववाडी, वरणगे, आंबेवाडी, रूकडी, पाटपन्हाळा, प्रयाग चिखली, वडणगे, पाडळी खुर्द, रूई, दोनवडे, कोडोली, माणगाव, सोनाळी, कोगे, बीड, आरे, चिंचवाड, वळीवडे, कुंभारवाडी, वाकरे, देवाळे, बोलोली, खटांगळे, पाटेकरवाडी, बालिंगा, मांजरवाडी, तेरसवाडी, सांगरूळ आदी गावांतील सरपंच, सदस्य उपस्थित होते.