भात खरेदी-विक्री थांबली : भुसाही पडून : पोल्ट्री व्यवसायासाठी असते भुशाची मागणी
संतोष सावंत / सावंतवाडी:
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ाच्या सीमा बंद झाल्याने कोकणातील भात अन् भुसा (कुंडा) पडून आहे. भात गिरणीच्या परिसरात उघडय़ावर असल्याने पावसात हा हजारो टन भुसा वाया जाण्याची भीती गिरण चालकांनी व्यक्त केली.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून गावागावात भातगिरण उद्योग सुरू केला. कर्ज काढून उभारलेला हा धंदा सध्या संकटात आहे. ‘कोरोना’मुळे कोल्हापूर भागात विक्री होणारा भुसा पडून असल्याने गिरण चालक संकटात सापडले आहेत. गिरण व्यवसाय चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
कोकणात भातपीक प्राधान्याने घेतले जाते. उन्हाळी, हिवाळी खरीब व रब्बी पीक घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यात भात गिरणीला लावून तांदूळ करतात. त्यातून जो भुसा मिळतो, तो मोठय़ा प्रमाणात घाटमाथ्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा, चंदगड भागात पाठविला जातो. मात्र, मार्चपासून लॉकडाऊनमुळे भात गिरणीवर आणणे सोडाच, भात खरेदी-विक्री व्यवहारही थांबले. भाताचा दरही गडगडला. शेतकऱयांकडील भात खरेदी-विक्री संघ, विकास सोसायटय़ा खरेदी करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे भात शेतकऱयांनी आपल्या घरी गोदामात ठेवले आहे.
भुसा पडून
तालुक्यात मोठय़ा प्रमाणात भुसा पडून आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडू लागल्याने वाहून जाण्याची भीती गिरण चालकांनी व्यक्त केली आहे. भुसा कोल्हापूर, सांगली, सातारा भागात पोल्ट्री व्यवसायासाठी जातो. भुशाला मोठी मागणी आहे. 35 ते 40 रुपये पोते दराने तो विकला जातो. लॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे व्यापारी भुसा खरेदीसाठी आले नाहीत. गिरणी उद्योगाबरोबर भुसा
विक्रीवर गिरणचालकांचा उदरनिर्वाह होतो. वर्षातून दोन-तीन महिने गिरणीवर आर्थिक उलाढाल असते. मात्र, यंदा विक्री झाली नसल्याने गिरण चालकांसमोर संकट उभे आहे. भुसा वाहतुकीची परवानगी द्यावी व गिरण चालकांना आर्थिक संकटातून सावरावे, अशी मागणी होत आहे.
कारिवडे-देऊळवाडीतील सुशिक्षित तरुण सुशांत सूर्यकांत नाईक, सुमन नाईक, सुहास नाईक भात गिरण, मसाला गिरणीचा व्यवसाय करतात. ते म्हणतात, सध्या भात गिरण चालविणे अशक्य झाले आहे. आमच्याकडे 35 टन भुसा पडून आहे. 20 टन भुसा वाया गेला आहे. शेतकऱयांचे भात आम्ही गिरणीवर विनामोबदला फिल्टरिंग करून देतो. त्या बदल्यात भुसा मिळतो. तो विकून लाईट बिल व इतर खर्च भागतात. सध्या भुशाला मागणी नाही. भुसा पावसात भिजल्यास आर्थिक नुकसान होणार आहे. सातारा भागात हा भुसा न मिळाल्यास पोल्ट्री व्यवसायालाही फटका बसणार आहे.
खरेदी-विक्री संघाकडून भात खरेदी
सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाने मोठय़ा प्रमाणात भात खरेदी केले आहे, असे चेअरमन बाबल ठाकुर यांनी स्पष्ट केले. या भाताची विक्री अद्याप झालेली नाही. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक भात शेतकऱयांकडून खरेदी करण्यात आले आहे. काही शेतकऱयांनी दरामुळे भात स्वत:कडे ठेवले आहे.