इश्क मजाजी आणि इश्क हकीकी या दोन्हींचा आरसा दाखवत जाणारी गझल! उपशास्त्रीय संगीतात मोडणारी आणि मेहंदी हसन, गुलाम अली, दक्षिणेत जन्मून उत्तरेतल्या गझलप्रेमींना वेड लावणारे हरिहरन, गझल या प्रांतातील ‘मलिका-ए-गझल’ हा किताब असलेल्या बेगम अख्तर उपाख्य अख्तरी फैजाबादी, ‘चिट्ठी आयी है’ फेम पंकज उधास, जगजीतसिंग-चित्रासिंग अशा आणि यासारख्या अनेक गायकांनी मैफिलीत रोशन केलेली गझल….प्रेयसीवर केलेली इश्क दाखवणारी गझल आणि त्यापाठीमागे साक्षात परमेश्वराला याद करणारी आणि दुहेरी भावनांचा विलक्षण विणीचा गोफ विणणारी गझल, सगळे शेर आपापसात गुंफलेली मुसल्सल गझल आणि प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असणारी गैर मुसल्सल गझल. रदीफ आणि काफिया या दोहोंना पूर्ण महत्त्व देऊन दोन्हीही मोठय़ा काळजीपूर्वक घडवणारी मुअद्दस गझल तर काफियावर जास्त लक्ष केंद्रित करणारी मुकफ्फा गझल. अरबी, फारसीतून उर्दूमार्गे थेट महाराष्ट्रात उतरलेली गझल. आणि विषय, आशय, तंत्र आणि सौंदर्य या चहुअंगानी रुजून अतिशय बहारीने जोमाने आणि उत्तम प्रकारे रसरसून वाढलेली गझल! एक गझल म्हटली की हे एवढे सगळे डोळय़ांसमोरून सरकायला लागते. मिर्जा गालिब, मीर, फिरा˜ाढ गोरखपुरी ते निदा फाजली, बेहजाद, गुलजार, जावेद अख्तर अशी कितीतरी नावे आपल्यासमोर येतील. यातले काही खास फक्त गझलकार आणि गुलजार किंवा जावेद अख्तर यासारख्या फिल्मी जगतातल्या बडय़ा हस्ती अशा प्रत्येकाच्या हातची एकेक वेगळी स्टाईल असते. जेव्हा गझलकाराच्या हातून नवा ‘नग’ घडतो, तेव्हा जोहरी बाजारात नवा जेवर घडल्याचा आनंद गझलशौकिनांना होत असतो. साहजिकच आहे, गझल म्हणजे मूर्तिमंत वेदना, गझल म्हणजे साक्षात आर्तता, विरह, प्रेम, वैफल्य अथवा रूपसौंदर्य यापैकी कोणत्याही गोष्टीला अतीच तरलतेने दिलेले खास पडदानशीन रूपडे! आणि अवगुंठन नावाची गोष्ट आहेच अशी की ती उत्कंठा वाढवते. दिसली पुनरपि गुप्त जाहली अशी असली की तर उत्सुकता, चर्चा, तर्क या सगळय़ा गोष्टींना ऊत येतो. अरबीकडून इराणी संस्कृती, तिथून भारतीय संस्कृती अशा प्रवासात गझल बदलत बदलत तिला नवनवीन आयाम प्राप्त झाले. आजकाल ‘मुशायरा’ अर्थात खास गझलकार संमेलन भरणे ही आम बात आहे. पूर्वी या मुशायरा संस्कृतीची ओळख निदान महाराष्ट्राला तरी नव्हती. तेव्हा जनामनात गझलचे अस्तित्त्व टिकले ते गाण्यातूनच. हजारो गझल आजपावेतो संगीतबद्ध होऊन आल्या असतील. प्रत्येकाची याबाबतीत आवडनिवड निरनिराळी असते. त्यामुळे सहज म्हणून आठवणारी गझल प्रत्येकाच्या मनातल्या खजिन्यात वेगवेगळी असते. अगदी जुनी गझल कृष्णधवल सिनेमातली आठवते.
हम है मता ए कूचा बाजार की तरह
उठती है हर नजर खरीदार की तरह
नायिका रहायला येण्याअगोदर तिथे एक कोठीवाली रहात असते. त्यामुळे नवे बिऱहाड आल्यावरही तिथले लोक वेळीअवेळी दार वाजवून त्या संसारी बाईला छळत राहतात. अशा आशयाच्या त्या सिनेमातली ही गझल सुन्न करून सोडते. तशीच
कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
‘हम दोनो’ मधली देव आनंदवर चित्रित झालेली ही गझल आयुष्याला प्रश्न विचारणारा, आयुष्याला स्वतःच उत्तर देणारा हा सैनिक त्या गझलच्या पार्श्वभूमीवर जास्त ठळक होत जातो. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही प्रकारच्या गझला तितक्मयाच ताकदीने गाणारे आमचे पं. सुरेश वाडकर
सीने में जलन आँखो में तूफान सा क्मयूँ हw
असे जितक्मया तीव्रपणे विचारतात, तेवढय़ाच सुघडतेने ‘चंद्र आता मावळाया लागला’ ही मराठी गझलही गातात. जगजीतसिंग हे नाव आणि गिटारच्या अतीव सुंदर पीसेसच्या साथीवर लहरणारी
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्मया गम है जिस को छुपा रहे हो
ही गझल, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या रेकॉर्डमध्ये किती म्हणून सुंदर गझल असाव्या! ‘तुमको देखा तो ये खयाल आया,’ ‘झुकी झुकी सी नजर….’ .एक से एक! अवघ्या दोन ओळींचा तो एकेक शेर, दुनिया दाखवतो. अक्षरशः नुसत्या डोळय़ांनी बोलणे आणि गझल यात बरेच साम्य असावे. हरिहरन हे याच क्षेत्रातले एक रीतसर आश्चर्य. या गृहस्थांच्या ‘काश’ या एकाच अल्बममध्ये ऐकणारा माणूस भुईसपाट होतो. एकेक गझल हजार हजार वेळा ऐकली तरी समाधान होणार नाही. मुख्य अबादानी म्हणजे त्यांचा अप्रतिम मुलायम, सोनसळी तरीही अथांग गहिऱया खर्जाचा आवाज हे एक कॅरेक्टरच आहे.
काश ऐसा कोई मंजर होता
मेरे कांधे पे तेरा सर होता
किंचित पाश्चात्त्य संगीताचा स्पर्श असलेली ती मायाविनी गझल एकदमच आपल्या डोळय़ांसमोर एकदम पूर्वपश्चिम संगम घडवून आणते. ‘आधी रात गुजर गयी, जाने नींद किधर गयी’ ही त्यातली कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त बोलणारी गझल..हरिहरन म्हणजे ‘काश’पासून ते ‘आबशार ए गझल’पर्यंत बरेच काही आहे. मेहंदी हसन आणि गुलाम अली यांच्याविषयी बोलण्याची तर पामरांची पात्रताच नसे. रंजिश ही सही आणि चुपके चुपके रातदिन या दोन गझल ऐकून पचनी पडल्या तर त्यांच्या उरलेल्या भव्य कारकिर्दीविषयी बोलणार ना आपण! बाकी यातली अगोदर उल्लेखिलेली सर्वच सन्माननीय नावे आपल्याला बरंच श्रीमंत करतात.
गझलच्या अंतरात्म्यात ज्या सम्राज्ञीला जागा आहे त्या बेगम अख्तर यांच्या उल्लेखाशिवाय उर्दू गझल पूर्णच होत नाही.
जाने क्मयों आज तेरे नाम पे रोना आया
ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया
ने आजपर्यंत किती जणांच्या विरहाच्या रात्रीत सोबत दिली असेल कोण जाणे.
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळय़ा केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे
हे गाणे ऐकताना आपल्याला ती गझल आहे हे माहीतही नसते. कारण तो सुरेश भट नावाचा चमत्कार आहे. गझलचा तंत्रशुद्ध अभ्यास करून इतर अभ्यासूंसाठी त्याचे प्रशिक्षण देणारा एल्गार आहे. गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दs असे म्हणत ते तरुण आहे रात्र अजुनी, जगतच मी आलो असा की, पासून रंग माझा वेगळा पर्यंत हिंडवत राहतात. आणि त्या काठावर खावर, इलाही, संगीता जोशी अशी नवी नवी (आता ज्ये÷)फुले दिसत राहतात भीमराव पांचाळे यांच्या स्वरात! गझलची एवढी का असह्य आठवण यावी? गीत झंकारते जीवनाचे गझल, भलभलते सांगतेस का उगाच भांडतेस सारख्या अप्रतिम गझला पाठी ठेवून अकाली निघून गेलेल्या ‘मधुसूदन नानिवडेकर’ नावाच्या ताऱयाने पाठी वळून तर पाहिले नसेल ना?
ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579