पर्यायी रस्ता करण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा : खानापूर तहसीलदारांचे आश्वासन हवेत : जिल्हाधिकाऱयांनाही आश्वासनाचा विसर
वार्ताहर / गुंजी
बेळगाव-पणजी महामार्गावरील रखडलेले महामार्गाचे काम मृत्यूला आमंत्रण देत आहे. या मार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून आणि धुळीच्या लोटातून नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. गुडघाभर धुळीत अडकणारी वाहने आणि धूळ उडवत ये-जा करणाऱया अवजड वाहनांपाठोपाठ दुचाकीस्वारांना डोळे झाकून धोका पत्करून कसरत करावी लागत आहे. या सर्वाला कंटाळून अखेर सोमवारी गुंजीतील संतप्त युवकांनी या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक रोखली.
या आधीही गुंजीत रास्तारोको करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊन रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी दुसऱया दिवशीपासून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे तसेच आठवडाभरात पर्यायी रस्ताकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला जवळजवळ वीस दिवस उलटले तरी अवजड वाहनांवर ना बंदी, ना रस्ता कामास सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी दिवसभर अवजड वाहने अडवून ठेवून ही वाहतूक रोखली. त्यामुळे गुंजीतील राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी फिरकले नसल्याने त्यांच्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती.
या मार्गावर सध्या सर्वच ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून अवजड वाहनांमुळे धुळीचे लोट उडत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱया चार चाकी व दुचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करून धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून या मार्गावर पर्यायी रस्त्यासाठी गुंजी, लोंढा, रामनगर व या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला अर्ज-विनंत्या करून, प्रसंगी रास्ता रोको करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे किंवा पर्यायी मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
आठवडाभरात रस्ता करून देण्याच्या आश्वासनाचे काय?
खानापूर तहसीलदार यांनी गुंजीतील रास्ता रोको आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेऊन आठवडाभरात रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. येथील काही प्रति÷ित नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱयांनी आठवडाभरात रस्ताकामास सुरुवात करून पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जवळजवळ वीस दिवस उलटले तरी अद्याप या रस्ताकामाला सुरुवात झाली नसल्याने जिल्हाधिकाऱयांना या आश्वासनाचा विसर पडला की काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
…तर पुन्हा आंदोलन करणार
या आठवडय़ात खानापूर-रामनगर या पर्यायी रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला नाही तर लोंढा, रामनगर, गुंजी या भागातील नागरिक पुन्हा करंबळ क्रॉस या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात येत आहे. यावेळी केवळ आश्वासन नाही तर कृती केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही या भागातील विविध संघटनांच्यावतीने देण्यात आला आहे.