वार्ताहर / गुंजी
येथील ग्रामपंचायतीने गेल्या आठवडय़ापासून गटार स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. मात्र गटारातील गाळ व कचरा रस्त्यावर फेकून दिला आहे. तो अद्याप उचलला नसल्याने येथील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या जगभरात कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे महत्त्व दिले जात आहे. तसेच खानापूर तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतीतून स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारणी देखील केली जात आहे. मात्र गुंजीसारख्या मोठय़ा ग्राम पंचायती सफाई कामगारांकडून गटारातील गाळ रस्त्यावर टाकणे हे अशोभनीय आहे. त्यावरून अनेक वाहने जात असल्याने कचरा रस्त्यावर इतरत्रः विखरून पडत आहे. तसेच पावसाच्या पाण्याने रस्त्यावरून वाहरून जात आहे. जवळजवळ आठवडा झाला तरी तो उचलण्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाल्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
सध्या गुंजीसह ग्रामपंचायतीच्या अनेक कार्यक्षेत्रात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. असे असताना देखील गुंजी पंचायतीने स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे, असा सवालसुद्धा नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. गुंजी पंचायतीची निवडणूक होऊन जवळजवळ दोन-तीन महिने झाले. मात्र अशा गंभीर प्रश्नाकडे पंचायतीच्या नवनिर्वाचित एकाही सदस्याने गांभीर्याने पाहू नये, ही खरोखरच खेदजनक बाब असल्याचे जनसामान्यांतून बोलले जात आहे.
याविषयी गुंजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी घाडी यांच्याशी संपर्क साधला असता लॉकडाऊनमुळे गटारातील काढलेला गाळ व कचरा रस्त्यावरच पडून राहिला आहे. तसेच सदर गटार स्वच्छतेचे कंत्राट दिले असून त्या कंत्राटदाराला कचरा उचलण्यासाठी अनेकवेळा सुचविले आहे. मात्र लॉकडाऊनचे कारण सांगून गाळ काढण्याचे टाळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अजून दहा-बारा दिवस लॉकडाऊन आहे. तोपर्यंत हा कचरा व गाळ रस्त्यावरच राहणार आहे का? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे
टाळले.