प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील संताजी दादासाहेब खंडागळे (40) यांचा खून व त्यांच्या पत्नीवरील खुनी हल्ल्या प्रकरणातील खतरनाक गुंड भावश्या उर्फ भाऊसो वसंत पाटील (38) याच्यावर शनिवारी आरोप निश्चित करण्यात आला. पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्या समोर आरोप निश्चित झाला. दरम्यान, भावश्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते.
दि. 1 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून खंडागळे यांच्या घरात घुसून संताजी यांचा निर्घृण खून करतानाच त्यांच्या पत्नी राजश्री व शेजारी विश्वास जाधव यांना जखमी केले होते. यावेळी त्याच्या समवेत दोन साथीदारही होते. त्यापूर्वी त्याने संताजी यांच्यावर गोळीबार करुन खूनी हल्ला केला होता. खंडागळे हे आ.मानसिंगराव नाईक यांचे मेव्हणे आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला होता. पोलीसांनी खंडागळे यांचे संरक्षण काढून घेतल्यानंतर काही महिन्यातच त्यांचा खून झाल्याने पोलीस दलाचीही तारांबळ उडाली होती. या खुनानंतर पसार झालेला भावश्या तब्बल दीड वर्षांनी मे 2018 मध्ये पंढरपूर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस फौजदार हणमंतराव देशमुख यांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करण्यात यश आले होते.
भावश्या हा शांत डोक्याचा खतरनाक आरोपी असून त्याने तीन खुनांसह खुनी हल्ले, चोरी यांसह अनेक गुन्हय़ात त्याचा सहभाग आहे. सन 2006 मध्ये चुलते बेपत्ता झाल्यानंतर त्याचा संशय रेठरेधरण येथील खंडागळे कुटुंबावर होता. त्यामुळे छोटे-मोठे गुन्हे करत तो गावाबाहेर गेला. पण, संताजी खंडागळे यांच्या बद्दल त्याच्या मनात रोष कायम होता. त्यातूनच खंडागळे यांच्याशी सलगी असणाऱया मोहन रामराव पाटील यांच्यावर त्याने कोयत्याने हल्ला केला. इस्लामपूर पोलिसांनी या गुह्यात त्याला अटक केली. दरम्यान सांगली कारागृहात असताना त्याची मैत्री विटय़ाच्या विकी गायकवाड टोळीबरोबर झाली. तिथून पुढे भावश्या गुन्हेगारीत अधिकच गुरफटत गेला.
सन 2010 मध्ये तो अचानक रेठरेधरणमध्ये घुसला. हातकणंगले तालुक्यातील आळतेच्या एकाची मदत घेऊन मोहन पाटील यांचा मुलगा धनाजी पाटील याचा धारदार शस्त्राने हल्ला करुन खून केला. दरम्यान प्रकाश शहाजी पाटील आणि त्यांच्या मित्रावर गोळीबार करुन तो पळाला. 16 जुलै 2010 मध्येच भावश्याने विटयाच्या संजय कांबळे याचा मित्रांसाठी खून केला. तो पसारच होता. तत्कालीन अप्पर पोलीस प्रमुख बाळासाहेब वाघमोडे यांच्या पथकाने छत्तीसगडमध्ये जावून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर त्याला इस्लामपूर न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी आणण्यात येत होते. दि. 18 ऑक्टोबर 2010 रोजी इस्लामपूर न्यायालयातून पोलिसांना गुंगारा देऊन तो पळाला होता. अशा भावश्याला शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणून त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आला. यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.