सुंदर पिचाईंनी पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर घेतला निर्णय, डिजिटायझेशन कार्यक्रमाला गती मिळणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या व्यापक डिजिटायझेशन (संगणकीकरण) कार्यक्रमाला आता गुगलचा परिसस्पर्श होणार आहे. ही कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची (1000 कोटी डॉलर्स) गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली. सोमवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांची दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घोषित करण्यात आला. सध्याच्या कोरोना संकटाच्या तणावग्रस्त काळात ही मोठीच शुभवार्ता आहे.
ही मोठी गुंतवणूक पुढील पाच ते सात वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. सोमवारीच पिचाई यांनी ‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमाच्या सहाव्या आवृत्तीच्या प्रसंगी केलेल्या आपल्या ‘व्हर्चुअल’ भाषणात या गुंतवणुकीचे स्वरूप स्पष्ट केले. ही गुंतवणूक समभाग गुंतवणूक, भागिदारी, पायाभूत सुविधा विकास, इकोसिस्टिम आदी विविध माध्यमांमधून आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे.
मोदींचाही ट्विट संदेश
पिचाई यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही ट्विटरवर या गुंतवणुकीची माहिती दिली. सोमवारी सकाळी आपली सुंदर पिचाई यांच्याशी अत्यंत यशस्वी चर्चा झाली. आम्ही विविध विषयांचा विचार केला. या चर्चेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचे लाभ यावर भर होता. भारतातील शेतकरी, युवक आणि उद्योजक यांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कसे परिवर्तन घडविता येईल, यावर आम्ही दोघांनी विचारांचे आदान-प्रदान केले. कोरोना उद्रेकाच्या परिस्थितीत भारतात आधुनिक कार्य संस्कृती (वर्क कल्चर) निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल, तसेच नव्या काळाची आव्हाने अशा अनेक विषयांवर आम्ही बोललो. पिचाई यांचे विचार मला फार भावले, असे प्रतिपादन मोदींनी ट्विटमध्ये केले आहे.
अनेक क्षेत्रांना लाभ
गुगलच्या भारतातील या प्रस्तावित गुंतवणुकीचे लाभ अनेक क्षेत्रांना होणार आहेत. यात ई-शिक्षण, डिजिटल इंडिया कार्यक्रम, विदा सुरक्षा (डाटा सिक्युरिटी), डिजिटल पेमेंट्स इत्यादी अनेक क्षेत्रांचा यात समावेश आहे. शिवाय भारतात यामुळे इतर मोठय़ा कंपन्यांनाही गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. उच्च तंत्रज्ञानाचा विकास होण्यासही याचे साहाय्य होणार आहे.
सर्वात मोठी गुंतवणूक
कोरोनाकाळात भारतात होणारी ही एका कंपनीची सर्वात मोठी गुंतवणूक घोषणा आहे. याआधी रिलायन्स जिओ या कंपनीत कोरोना काळातच 1 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव आले आहेत. मात्र ही गुंतवणूक विविध कंपन्यांकडून केली जाणार आहे. त्यात अमेरिकन तसेच इतर देशांच्याही कंपन्या आहेत. त्यामुळे गुगलच्या या प्रस्तावित गुंतवणुकीचे महत्व आहे.
प्रशासनालाही साहाय्य होणार
भारताच्या डिजिटायझेशन कार्यक्रमाचा लाभ नागरी प्रशासन सुधारण्यासाठीही होणार आहे. सध्या मानवी हातांनी केली जाणारी अनेक प्रशासकीय कामे डिजिटायझेशननंतर संगणकाच्या माध्यमातून थेट केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
आनंददायक वार्ता…
ड कोरोनाच्या संकटकाळातील तणाव दूर करणारी शुभवार्ता
ड गुगलच्या गुंतवणुकीमुळे उच्च तंत्रज्ञानाला मिळणार बळ
ड डिजिटायझेशनमुळे प्रशासनापासून शिक्षणापर्यंत लाभ होणार
ड मोठय़ा गुंतवणुकीमुळे मोठय़ा प्रमाणात रोजगारही येणार
ड गुगलमुळे अन्य कंपन्यांही भारताकडे आकृष्ट होणे शक्य