ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. देशात अत्यावश्यक औषधांसह ऑक्सिजन आणि इतर उपकरणांचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलनेही भारताला 135 कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे.
पिचाई यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती पाहून धक्का बसला. गुगल आणि गुगलमधील सर्वजण भारताला 135 कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था तसेच सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि लोकांपर्यंत कोरोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरण्यात येईल.