अहमदाबाद
गुजरातच्या भरुच येथील भाजप खासदार मनसुख वसावा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुढील लोकसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वसावा यांनी गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील यांना पत्र लिहून स्वतःच्या निर्णयाची माहिती दिली आहे. राजीनाम्याची कारणे मात्र वसावा यांनी स्पष्ट केलेली नाहीत. परंतु ते अनेकदा स्वतःच्या विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. पक्षासोबत प्रामाणिक राहिलो आहे. पक्ष आणि जीवनात तत्त्वांचे पालन करताना मोठी खबरदारी बाळगली, परंतु मी एक माणसू असून माणसाकडून चुका होत असतात. याचमुळे मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे वसावा यांनी पत्रात नमूद केले आहे. गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत असल्याचा आरोप वसावा यांनी अलिकडेच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पत्र लिहून केला होता. याचबरोबर स्टॅच्यू ऑफ युनिटीसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी पत्र लिहिले होते. पुतळय़ानजीकचे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. याचबरोबर केंद्रात भाजप सरकार असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.