ऑनलाईन टीम / गांधीनगर :
राज्यसभा निवडणूका तोंडावर आल्या असतानाच गुजरातमधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. आमदार जितू चौधरी आणि अक्षय पटेल यांनी सभापती राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत.
या दोन नव्या राजीनाम्यांमुळे काँग्रेसच्या राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या 7 वर पोहचली आहे. लॉकडाऊनपूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजप आणि काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले असते. या दोन जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे काठावरचे संख्याबळ होते.
भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी अभय भारद्वाज,
रमिला बारा आणि नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने शक्तींसिह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना रिंगणात उतरवले आहे. 4 जागांसाठी 5 जण रिंगणात आहेत. त्यापैकी 3 जागा सध्या भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे. चार जागांसाठी 5 उमेदवार असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे.