प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱयावर टीका करणाऱया विरोधकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी दौऱयात चोख प्रत्युत्तर दिले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जमिनीवर तरी उतरले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये जाऊन जमिनीवर तरी उतरले का? याचा शोध घ्यावा, मग टीका करणाऱयांना याचं उत्तर मिळेल, असा टोला पटोले यांनी यावेळी लगावला.
जिल्हय़ातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी पटोले रविवारी रत्नागिरी दौऱयावर आले होते. यावेळी ते बोलत होते.पटोले यांनी गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीवरून थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. आपण गुजरातचेच पंतप्रधान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल्याचेही पटोले यावेळी म्हणाले. केंद्राच्या तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशावेळेस केंद्राने भरीव मदत करावी. त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटीची तरी मदत करतील, अशी आम्हांला अपेक्षा आहे आणि ते आमच्या अधिकाराचे पैसे आहेत.. भीक नाही, अशा शब्दांत ठणकावले. राज्यपाल भवन हे भाजपाचं कार्यालय झाले आहे. त्या ठिकाणी एका पक्षाचं राजकारण चालतं, अशी टीका पटोले यांनी केली.
यावेळी पटोले म्हणाले की, कधी नव्हे असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही आगळीवेगळी आहे. राज्यपालपदाची एक वेगळी गरिमा आहे. राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात. राज्यपाल हा राज्यातील सर्व जनतेचा असावा, असे म्हणत पटोले यांनी राज्यपालांवर आक्षेप घेतला. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत जी नावे पाठवण्यात आली आहेत, ती नियमाला धरून पाठवण्यात आली आहेत. जर त्याच्यात काही चुकले असेल तर राज्यपालांनी कळवलं पाहिजे. त्याच्यात काही चुक असेल तर राज्य सरकार करून देईल, मात्र त्यांची नियुक्ती थांबवणे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. भाजपाने या प्रकारचे कृत्य करू नये, अशी टीका पटोले यांनी यावेळी केली. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात जे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीबाबत मदत देताना राज्य सरकार कुठलाही भेदभाव करणार नाही. पूर्ण मदत करेल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
मिरकरवाडा जेटीला भेट देत केली नुकसानीची पाहणी
जिल्हय़ातील नुकसानीच्या पाहणीसाठी पटोले रविवारी दौऱयावर आले होते. यावेळी येथील मिरकरवाडा जेटीला भेट देत बोटींच्या नुकसानीची पाहणी करत नुकसानीबाबत मच्छीमारांकडून माहिती घेतली. मिरकरवाडा येथील 28 मच्छीमारी नौका बाधित झाल्या आहेत. या सर्व नुकसानीची पटोले यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हा मच्छीमार संघाचे बाबामियाँ मुकादम यांनी पटोले यांना काही समस्या सांगितल्या.
यावेळी माजी खासदार हुसैन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप, काँगेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेस नेते अविनाश लाड, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, प्रदेश चिटणीस रमेश कीर, अशोक जाधव, राजीवडा मच्छीमार सोसायटीचे सदस्य शब्बीर भाटकर, जयहिंद मच्छीमार सोसायटीचे आयरे, कोकण विभागीय फिशरमन काँग्रेसचे मार्तंड नाखवा, काँग्रेस जिल्हा जनरल सेक्रेटरी दीपक राऊत, निसार दर्वे, निसार बोरकर, करीम नाकवा, शकील दावत, अश्विनी आगाशे, सुश्मिता सुर्वे, रूपाली सावंत, कपिल नागवेकर आदी उपस्थित होते.