ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेस गुजरातमधील वलसाडजवळ रेल्वे रुळावर काही उपद्रवी लोकांनी ठेवलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. सुदैवाने हा खांब रुळाच्या खाली पडल्याने मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी संध्याकाळी 7.10 च्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ काही समाजकंटकांनी रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून रेल्वे उलटविण्याचा कट रचला होता. शुक्रवारी संध्याकाळी 7.10 च्या सुमारास मुंबई-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस रेल्वे ट्रकवर ठेवलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. त्यानंतर हा खांब रुळावरुन खाली पडला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, सुरत रेंजचे डीजी, वलसाड पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे राजधानीसह सर्व गाडय़ा थांबवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.