श्रीनगर / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने एबीजी शिपयार्ड कंपनीसह 8 जणांविरुद्ध 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिपयार्डचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांचाही समावेश आहे.
एबीजी शिपयार्ड ही जहाजांचे बांधकाम आणि दुरुस्तीशी संबंधित असलेली कंपनी आहे. गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे कंपनीची केंद्रे आहेत. एफआयआरनुसार हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 या कालावधीतील आहे. एसबीआय डीजीएमनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एबीजी शिपयार्डने आयसीआयसीआय बँकेचे 7,089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3,634 कोटी, एसबीआयचे 2,468 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 1,614 कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे 1,244 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेचे 1,228 कोटी आणि एलआयसीचे 136 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. हा घोटाळा बँकिंग फसवणुकीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा केला जात आहे.
एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या फसवणुकीत सहभागी असलेल्या दोन मोठय़ा कंपन्यांची नावे आहेत. दोन्ही कंपन्या एकाच समूहाच्या आहेत. बँकांमधून फसवणूक करून परदेशातही पैसे पाठवले गेले आणि अनेक मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. सर्व नियम-कायदे धाब्यावर बसवून कंपनीतून दुसऱया कंपनीत पैसे पाठवल्याची तक्रार सीबीआयने नोंदवली आहे.
पहिली तक्रार तीन वर्षांपूर्वी
एबीजी शिपयार्डविरोधात बँकेने 8 नोव्हेंबर 2019 रोजी पहिली तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी स्पष्टीकरण मागितले होते. बँकेने त्याचवषी ऑगस्टमध्ये नवीन तक्रार दाखल केली. दीड वर्षांहून अधिक काळ तपास केल्यानंतर सीबीआयने 7 फेब्रुवारी 2022 रोजी प्राथमिक तक्रारीनुसार कारवाई करत एफआयआर नोंदवले आहे. त्यानुसार कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त तत्कालीन कार्यकारी संचालक संथनम मुथास्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवेटिया यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.