प्रतिनिधी/ मुंबई
जहाज बांधकाम, दुरुस्ती करणाऱया गुजरातमधील एबीजी शिपयार्ड कंपनीच्या 22,842 कोटी रुपयांच्या बँकिंग घोटाळय़ाप्रकरणी रविवारी मोठय़ा प्रमाणात सीबीआयने छापेमारी केली. गुजरातच्या सुरतसह 2 शहरे व मुंबई येथे ही कारवाई करण्यात आली.
विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शिपयार्ड कंपनीचा 28 बँकांचा 22.842 कोटींचा आहे. यासंदर्भात रविवारी दिवसभर सीबीआयकडून सुरतसह मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी सुरू होती. शनिवारी सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरनुसार हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 या कालावधीत झाला आहे.
एसबीआय डीजीएमच्या तक्रारीनुसार, एबीजीने आयसीआयसीआय बँकेचे 7,089 कोटी, आयडीबीआयचे 3,634 कोटी, एसबीआयचे 2,468 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 1,614 कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे 1,244 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेचे 1,228 कोटी आणि एलआयसीचे 136 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. यासंदर्भात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ऋषी कलमेश अग्रवाल, तत्कालीन कार्यकारी संचालक संथनम मुथास्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशीलकुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवेटिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.