मीठ कारखान्याची भिंत कोसळून दुर्घटना ः 18 जखमी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी जिह्यातील हलवड येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून पाच महिलांसह 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे. भिंतीच्या ढिगाऱयाखाली सुमारे 30 कामगार गाडले गेले. जेसीबी मशिनच्या साहाय्याने मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले मजूर हे राधानपूर तालुक्मयातील रहिवासी आहेत.
हलवड जीआयडीसी येथील सागर सॉल्ट नावाच्या कारखान्यात बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेवेळी सुमारे 30 मजूर तेथे काम करत होते. याप्रसंगी मजुरांसोबत त्यांची मुलेही घटनास्थळी होती. सदर मुलेही अपघाताचे बळी ठरल्याची माहिती मिळत आहे. मात्र मुलांबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघातानंतर स्थानिक लोकांनीही बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर स्थानिक आमदार पुरुषोत्तम छाब्रिया आणि जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक उच्चपदस्थही घटनास्थळी पोहोचले. भिंत कशामुळे कोसळली, हे अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताच्या अर्धा तास आधीपर्यंत 40 हून अधिक मजूर येथे मीठ पॅकिंग करत होते. त्यानंतर अनेकजण जेवायला बाहेर गेले होते. अन्यथा आणखी कामगारांचा मृत्यू झाला असता, अशी माहितीही देण्यात आली.
पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना शोक;आर्थिक मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मोरबीमध्ये भिंत कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या दुःखदप्रसंगी पीडितांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना असल्याचे त्यांनी नमूद केले. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50-50 हजार रुपये आणि त्यांच्यावर संपूर्ण उपचार मोफत करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.