10 जणांना अटक – तटरक्षक दलाची कारवाई
@ पोरबंदर / वृत्तसंस्था
भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात केलेल्या एका मोठय़ा कारवाईमध्ये ‘यासिन’ नावाची पाकिस्तानी बोट 10 कर्मचाऱयांसह पकडली आहे. तटरक्षक दलाच्या जहाज अंकितने शनिवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई केली. या माध्यमातून पाकिस्तानचा आणखी एक कट समोर आला. बोट पोरबंदरला आणल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. सध्या बोट जप्त करण्यात आली असून त्यातून 2 टन मासे आणि 600 लिटर इंधन जप्त करण्यात आले आहे. भारतीय समुद्रहद्दीत घुसखोरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रथमदर्शनी ही बोट मच्छिमारीसाठी आल्याचे स्पष्ट होत असले तरी अटक करण्यात आलेल्यांची पूर्ण चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱयांनी सांगितले. यापूर्वी पंजाबमध्ये सतलज नदीतून पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली होती.
2008 च्या मुंबई हल्ल्यातही अशाच प्रकारे दहशतवादी देशाच्या सीमेत घुसले होते. मुंबई हल्ल्यावेळी दहशतवादी बोटीत बसून पाकिस्तानातील कराची येथून समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले होते. 2008 च्या तुलनेत भारतीय नौदलाच्या ताकदीतही लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय लष्कराची रडार यंत्रणाही मजबूत करण्यात आली आहे, ज्यामुळे नौदलाला समुद्रात बारीक लक्ष ठेवता येते.
दोन दिवसांपूर्वीच पंजाबमधील फिरोजपूर जिह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर सतलज नदीतून बीएसएफने पाकिस्तानी बोट जप्त केली होती. ही बोट रिकामी होती.या भागात अमली पदार्थांचे तस्कर खूप सक्रिय आहेत. त्यांचे पाकिस्तानी तस्करांशीही संबंध आहेत. बीएसएफने अनेकवेळा या तस्करांकडून मोठय़ा प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.