ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असतानाच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशातील गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त आहेतच, आता त्रिपुरा देखील कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे देशातील एकूण चार राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत.
या बाबत माहिती देताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिल्पब देव म्हणाले की, त्रिपुरा मध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्रिपुरा राज्य कोरोनामुक्त झाले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशातील एकूण चार राज्ये आता कोरोनामुक्त झाली असल्याने, देशासमोरील चिंता काही प्रमाणात तरी आता कमी झाली आहे.
दरम्यान, देशात अशी काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जेथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही आहे. यामध्ये सिक्कीम, नागालँड राज्य तसेच दमण दिव, दादरा, लक्षदिप आणि नगर हवेली आधी केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
मात्र, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.