नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
तिहार तुरुंगात कैद निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना तुरुंग प्रशासनाने नोटीस बजावून अंतिम ईच्छा विचारली आहे. 1 फेब्रुवारी रोजी निर्धारित फाशीच्या दिनापूर्वी अखेरची भेट कुणाची घेऊ इच्छिता? एखादी मालमत्ता नावावर असल्यास ती अन्य कुणाच्या नावावर हस्तांतरित करू इच्छिता का? धार्मिक पुस्तक वाचायचे आहे का किंवा कुठल्या धर्मगुरुला बोलाविले जावे का अशी विचारणा नोटीसद्वारे करण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या अंतिम इच्छा 1 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण केल्या जाऊ शकतात.
चारपैकी एकाने स्वतःचे आयुष्य संपुष्टात येण्याच्या भीतीने जेवणच सोडून दिले आहे. तर दुसऱयाचे जेवण कमी झाले आहे. विनय या गुन्हेगाराने दोन दिवस भोजनच केले नव्हते. पण बुधवारी आग्रहास्तव त्याने काही प्रमाणात जेवण केल्याचे तुरुंग अधिकाऱयांनी सांगितले आहे.
मुकेश, अक्षय निष्ठूर
मुकेश आणि अक्षय या गुन्हेगारांवर फाशीचा दिन नजीक आल्याचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही. यातील मुकेशजवळ फाशी टाळण्यासाठी स्वतःच्या बचावातील सर्व उपाय संपुष्टात आले आहेत. मुकेशची दयायाचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. तर अन्य 3 गुन्हेगारांकडे दयायाचिका सादर करणे तर दोघांसमोर सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल करण्याचा कायदेशीर मार्ग शिल्लक आहे.
4 कैद्यांसाठी 32 सुरक्षारक्षक
चारही गुन्हेगारांना तिहार तुरुंग क्रमांक-3 मध्ये विविध कोठडय़ांमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गुन्हेगाराच्या कोठडीबाहेर दोन सुरक्षारक्षक तैनात आहेत. यातील एक हिंदी भाषिक पण तामिळनाडू विशेष पोलीस दलाचा जवान तर दुसरा सुरक्षारक्षक तिहार तुरुंग प्रशासनाचा असतो. दर दोन तासांमध्ये या सुरक्षारक्षकांना बदलण्यात येते. एका कैद्याकरता 24 तासांमध्ये 8 सुरक्षारक्षक तैनात आहेत. म्हणजेच 4 गुन्हेगारांसाठी एकूण 32 सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.