लहान वासरे टार्गेट : सात ते आठ गुरे गायब
प्रतिनिधी / शिरोडा
गुरांची तस्करी करणारी टोळी फोंडा परिसरात सक्रीय झाली असून गेल्या काही दिवसांमध्ये बरीच गुरे पळविल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ढवळी भागातील फोंडा-मडगाव महामार्गालगत फिरणारी भटकी गुरे या तस्करांनी पळविल्याची माहिती काही स्थानिकांकडून मिळाली आहे.
उशिरा रात्री टेंपो घेऊन फिरणारी ही टोळी गाईच्या वासरांचीच तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात फिरणारी अशी सात ते आठ वासरे गेल्या काही दिवसांत पळविण्यात आली आहेत. ढवळी भागात रहिवासी कॉलनीमध्ये राहणारे नागरिक व येथील दुकानदारांकडून या भटक्या गुरांना रात्रीच्यावेळी जेवण दिले जाते. येथील एका हॉटेलचालकाच्या म्हणण्यानुसार या गुरांसोबत फिरणारी छोटी वासरे लागोपाठ गायब झाली आहेत. गुरांची तस्करी करणाऱया टोळीचेच हे काम असावे असा संशयही त्यांनी व्यक्त केला. सध्या पावसाचे दिवस आहेत व लॉकडाऊनमुळे रात्री लोकांचा वावरही कमी झाल्याने त्याचा फायदा घेत, गुरांची तस्करी केली जात असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे. रात्रीच्यावेळी कोसळणाऱया पावसामुळे या तस्करांच्या हालचालींचा आवाज आसपास राहणाऱया लोकांना येते नाही. त्याचाच फायदा ही टोळी उठवित आहे. ढवळी भागाबरोबरच फोंडय़ातील इतर काही भागांमध्येही यापूर्वी गुरे पळविण्याचे प्रकार उघडकीस आले होते. रात्री गस्त घालणाऱया पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी केल्यास तस्कारांच्या टोळीला आळा बसणार असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.
बोरी येथील प्राणीमित्र आशय कोरडे यांच्या म्हणण्यानुसार भटक्या गुरांच्या तस्करीबरोबरच अज्ञात वाहनांनी ठोकरल्याने बऱयाच गुरांचा बळी जात आहे. हे प्रकार थांबण्यासाठी शेतकऱयांनी आपल्या गुरांना मोकाट न सोडता त्यांचे योग्यप्रकारे पालन पोषण करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीनाही भटक्या गुरांसाठी कोंडवाडय़ांची व्यवस्था करावी लागेल. तस्करी होणारी गुरे बेकायदेशीर कत्तल खान्यात नेली जात असून अशा कत्तलखान्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. प्राणीमित्र राहूल देसाई यांच्या मतानुसार गुरांची होणारी तस्करी हा मुळात गुन्हाच आहे. गुरांना मोकाट सोडले जात असल्याने अशा लोकांचे फावते. गुरांची देखभाल केल्यास अशा गैरप्रकारांना वाव मिळणार नाही.