बेळगाव/प्रतिनिधी
आजवर कोणत्याही पुरस्कारांच्या मागे न लागता जीवनात चित्रकलेच्या माध्यमातून मिळालेला सन्मान लाखमोलाचा आहे. चित्रकलेसाठी लाभलेल्या गुरुंच्या जन्मशताब्दी महोत्सवात मिळणारा पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यामुळे याचा मला अभिमान आहे, असे विचार ज्ये÷ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले.
मंगळवारी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित कलामहर्षी के. बी. कुलकर्णी शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात चित्रकार रवी परांजपे यांना जीवनगौरव तर विकास पाटणकर यांना कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी बोलताना रवी परांजपे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच के. बी. कुलकर्णी आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रवी परांजपे यांच्या जीवनावरील लघुपट सादर करण्यात आला. या लघुपटाद्वारे रवी परांजपे यांच्या जीवन प्रवासाचे अनेक पैलू दर्शविण्यात आले. त्याला उपस्थितांनी दाद देऊन परांजपे यांचे अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना रवी परांजपे यांनी आपल्याला 1996 साली लाभलेल्या कॅगच्या हॉल ऑफ फेम पुरस्काराची आठवण करून दिली. त्यावेळी त्या पुरस्काराच्या प्राप्तीसाठी असणारे निकष म्हणजे कलेतील सातत्य, चित्रकाराची व्यावसायिकता आणि स्वतःची वेगळी शैली असे निकष होते. त्या निकषावर आधारित पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली. त्यामुळे सध्या पद्म पुरस्कारासाठी देखील असे निकष लावले जातात की नाही, अशी शंका येते. मात्र चित्रकलेच्या शिखरापर्यंतचा प्रवास करताना बेळगावात प्रारंभीचे शिक्षण घेतले. याचा आजही अभिमान आहे. तसेच पंडित भीमसेन जोशी आणि के. बी. कुलकर्णी यांना मी गुरु मानतो. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात पुरस्कार मिळणे हा आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
के. बी. सरांना पद्मश्री मिळायला हवा
यावेळी बोलताना चित्रकर्मी दत्ता पाडेकर म्हणाले, चित्रकारांच्या कलेचा योग्य सन्मान होण्याची परंपरा भारतात आजही रुजलेली नाही. के. बी. सरांचे कर्तृत्व खूप मोठे होते. त्यांच्याकडून शिक्षण घेऊन रवी परांजपे यांनी पुढचा टप्पा गाठला. त्यांचे कर्तृत्व पाहता त्यांना पद्मश्री सन्मान मिळायला हवा. परंतु तो अद्याप मिळू शकलेला नाही. अशा कलाकारांची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.
सत्काराला उत्तर देताना विकास पाटणेकर यांनी सरांकडून बरेच काही शिकता आले. त्यावेळी त्यांनी कधीही संकटापासून मागे फिरू नका, अशी शिकवण दिली. आदर्श गुरु कसे असावेत, याचे उदाहरण होते, असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार रवी परांजपे यांच्यासह त्यांच्या पत्नी स्मिता परांजपे आणि विकास पाटणकर यांच्या मातोश्री विद्या पाटणेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
त्यावेळी व्यासपीठावर बाबा धोंड, जन्मशताब्दी सोहळय़ाचे निमंत्रक जगदीश कुंटे, ज्ये÷ चित्रकार मारुती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सादर करण्यात आलेल्या लघुपटाची निर्मिती चंद्रकांत जोशी कुलकर्णी, संकेत कुलकर्णी यांच्या कल्पनेतून साकारलेली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. जे. बी. फडके यांनी आभार मानले.
के. बी. कुलकर्णींच्या चित्रांचे प्रदर्शन
के. बी. कुलकर्णी यांनी चित्रकलेच्या प्रांतात बेळगावचे नाव उंचावले. त्यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा मंगळवारपासून सुरू झाला. यानिमित्त वरेरकर नाटय़ संघाच्या तळमजल्यावर के.बी.ंच्या चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. ज्ये÷ चित्रकार रवी परांजपे यांनी फीत कापून जन्मशताब्दी सोहळय़ाचे उद्घाटन केले. तर अभिनेते आणि चित्रकार नाना पाटेकर यांनी के. बीं. च्या पुतळय़ाचे अनावरण केले. एसकेई सोसायटीचे पदाधिकारी दिलीप चिटणीस यांनी रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात के. बी. कुलकर्णी यांच्या एकाहून एक सरस आणि कलात्मक चित्रांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचाही समावेश आहे. नाना पाटेकर, रवी परांजपे यांच्यासह के.बीं.चे अनेक शिष्य याप्रसंगी उपस्थित होते. प्रदर्शनातील चित्रे पाहताना के. बी. कुलकर्णी यांची चित्रशैली किती बोलकी आहे, याचे प्रत्यंतर सर्वांनाच आले. जगदीश कुंटे यांनी स्वागत केले. वृषाली मराठे यांनी सूत्रसंचालन केले.