स्वच्छता करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी कोटय़वधी निधी खर्चून देखील स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. टिळकवाडी, गुरुवारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलाशेजारी कचऱयाचे ढिगारे साचले असून स्वच्छता करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गुरुवारपेठ येथील सहय़ाद्री सोसायटीच्या समोर व लोकमान्य सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत गेल्या कित्येक महिन्यांपासून कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. कचऱयाची उचल करण्याची मागणी सातत्याने केली जाते. पण याची दखल घेतली जात नाही. त्या परिसरात विविध व्यावसायिक दुकाने असून यामध्ये किराणा दुकान, झेरॉक्स सेंटर, चहा कँटिन, कापड दुकाने, भाजी दुकाने, मेस आदींचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरात ये-जा करणाऱया नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. कचऱयामुळे डांसाचा आणि दुर्गंधीचा उपद्रव वाढला असून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कचरा उचल नियमित करा
डेंग्यूसारख्या आजाराचा प्रसार वाढला असताना येथील स्वच्छता करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. येथील कचऱयाची उचल नियमितपणे करण्यात यावी, तसेच रोगप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तर कचऱयामुळे चिखल देखील निर्माण होत असून याठिकाणी पेव्हर्स घालून रस्ता करण्यात यावा, अशी मागणी व्यापारीवर्ग करीत आहे. याबाबतचे निवेदन मनपाकडे देण्यात आले असून यावर परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशांच्या सहय़ा आहेत.