जनतेला कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे पुन्हा एकदा आले दिसून
प्रतिनिधी / बेळगाव
विकेंड लॉकडाऊनमधील कालमर्यादा वाढविण्यात आली आहे. शुक्रवारपासूनच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सलग तीन दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पुन्हा नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गुरुवारी सकाळीच बाजारपेठेत मोठी गर्दी केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करून ही खरेदी केली. यामुळे जनतेला कोरोनाचे भानच नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊन करूनही ही संख्या वाढत असल्यामुळे विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी या विकेंड लॉकडाऊनमध्ये एक दिवसाने वाढ करण्यात आली. त्यामुळे जणू आता आम्हाला तीन दिवस उपाशीच राहावे लागणार की काय, अशी समजूत करून घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी खरेदी करण्यावर भर दिला. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते अडविले होते. तरीदेखील खुल्या असलेल्या रस्त्यांवरून मुख्य बाजारपेठेकडे धाव घेतल्याचे दिसून आले.
रविवारपेठ, शहापूरमधील खडेबाजार, वडगावमधील बाजार गल्ली व टिळकवाडी तसेच इतर परिसरात गर्दी दिसून आली.
मॉलसमोरही खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. कोरोनाचे कोणतेच भान त्यांना नसल्याचे दिसून आले. यामुळे अनेक जाणकारांतून नागरिकांच्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील जनताही शहराकडे आल्याचे दिसून आले. लहान-सहान व्यापारी तीन दिवसांचा साठा करण्यासाठी रविवारपेठेतील बाजारपेठेत दाखल झाले होते. दुचाकी वाहनांवरून मोठय़ा प्रमाणात साहित्य नेण्यात येत होते.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर दिलेल्या वेळेत खरेदी करण्यासाठी झुंबड उडताना दिसत आहे. आता तीन दिवस कडक लॉकडाऊन असल्यामुळे गुरुवारी शहरातील तसेच उपनगरांमधील अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनीही काही जणांना अडवून त्यांची चौकशी केली. नाहक बाहेर पडलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अनगोळ येथेही खरेदीसाठी उडाली झुंबड
गुरुवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत खरेदी करण्यासाठी अनगोळमध्ये एकच झुंबड उडाली. धर्मवीर संभाजी चौक, अनगोळ मुख्य रस्ता या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भाजी, किराणा माल आणि आंबे खरेदी करण्यासाठी लोक धडपडत होते. विपेतेही रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसून विक्री करत होते. मोठा धोका पत्करून ही खरेदी करण्यात येत होती. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही गर्दी पाहून कोरोना गायब झाला आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अनगोळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गल्लोगल्ली वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनासह इतर आजारांनी रुग्ण त्रस्त आहेत. दवाखान्यांमध्ये उपचारासाठी गर्दी होत आहे. अनेकांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. खासगी हॉस्पिटल्सचे उपचार परवडणे अवघड आहे. असे असताना खरेदीसाठी अशा प्रकारे रस्त्यावर उतरणे कितपत योग्य आहे? घरी सुरक्षित राहून कोरोना कमी झाल्यानंतर खरेदी केली तर चालत नाही का? असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे.