अकोळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन असे तीन टप्पे येतात. यामध्ये खऱयाअर्थाने बालमनावर चांगले संस्कार प्राथमिक शालेय जीवनातच मिळतात. ते प्राप्त करून देणारे गुरु हेच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत. याचे स्मरण प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डॉ. किशोर गुरव यांनी केले. अकोळ प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने आयोजित केलेल्या सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक संघाचे नूतन संचालक, ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षपदी संघाचे सचिव अनिल शिंदे होते. माता-पित्यानंतर प्राथमिक शालेय जीवनात मुलांच्या मनावर आदर्श संस्कार घडविण्यामागे प्राथमिक शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. संस्काराच्या माध्यमातून आपल्या जडण-घडणीतील सहभागी विविध घटकांशी आपण सदैव प्रामाणिक राहणे गरजेचे असल्याचेही गुरव यांनी सांगितले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रास्ताविक एन. के. सुतार यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक आप्पासाहेब कुरळुप्पे, आप्पासाहेब कोळी, हिराबाई शेटके, एस. डी. उपाध्ये, अशोक पुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सातवी, दहावी व बारावी परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याबरोबरच बीएसएफमध्ये निवड झालेल्या निखील भारमल, शिक्षक संघाचे संचालक भास्कर स्वामी, शिल्पा मलाबादे, सुनीता प्रताप, क्रीडा क्षेत्रात यश मिळविलेल्या शिक्षिका सीमा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.