पणजी / प्रतिनिधी
ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक, कथाकार, ’गुलमोहर’कार जयराम पांडुरंग कामत (83) यांचे अल्प आजाराने शुक्रवार 12 रोजी सकाळी 7 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, पुत्र अतुल, अरुण, उदय, स्नुषा ः पुनम, वर्षा, नातवंडे अदिती, ऋता, हर्ष असा परिवार आहे.
जयराम कामत यांचा जन्म 2 जुलै 1937 साली पारवाडा अस्नोडा येथे झाला. त्यांचे शिक्षण पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले मुंबई येथे झाले. 1962 मध्ये त्यांनी कविता लेखनाला प्रारंभ केला. 1970 च्या आसपास त्यांनी आकाशवाणी केंद्रावरून अनेक कथा, कविता सादर केल्या. त्यांचे अंधारयात्री, क्रांतीदूत, सुखिया, गुलमोहर या संग्रहाचे प्रकाशन झाले असून त्यांना गोवा अकादमीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर गोवा सरकारतर्फे त्यांना गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गोमंतक मराठी अकादमी तर्फे मानद अधिसदस्यत्व बहाल करून गौरव करण्यात आला. तसेच 2020 साली बोरी येथे भरलेल्या 14 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. 2017 मध्ये त्यांना बिल्वदल सांखळी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचप्रमाणे माधव वझे (श्यामची आई चित्रपटातील शाम व्यक्तिरेखा) यांनी क्रांतीदूत कथेचे नाटय़रुपांतर करून ते प्रायोगिक मराठी रंगभूमीवर सादर केले होते.