प्रतिनिधी/ सांगे
वालकिणी वसाहत क्रमांक-1 येथील सांगे ते नेत्रावळी रस्त्याच्या कडेला असलेले जीर्ण व जुने गुलमोहराचे झाड शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावरून जाणाऱया एका चारचाकी वाहनावर कोसळल्याने सदर वाहनाची हानी झाली, मात्र दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला. कुडचडे येथील अग्निशामक दल व आपत्कालीन दलाच्या रक्षकांनी सदर झाड कापून वाहतुकीस रस्ता खुला करून दिला. सुमारे अडीच तास वाहतुकीस रस्ता बंद होता. घटनास्थळी सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे तातडीने पोहोचले व त्यांनी मदतकार्यास गती आणली.
शुक्रवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान रस्त्याशेजारी असलेले सदर झाड अकस्मात कोसळले. त्याचवेळी होंडा सिटी ही गाडी रस्त्यावरून जात होती. या वाहनावर सदर झाडाचा भाग कोसळला व त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी किंवा गाडीतील कुणाला दुखापत झाली नाही. मात्र झाड कापून रस्ता खुला करण्यास बराच कालावधी लागला. घटनास्थळी भाटीचे सरपंच उदय नाईक हे देखील पोहोचले होते.
विजेचे दोन खांब मोडल्याने वीजपुरवठा खंडित
तसेच रस्त्याच्या शेजारील दोन विजेचे खांब मोडून पडले. त्यामुळे बाराजण, कोंगारे, पोत्रे येथील नागरिकांना रात्र विजेविना काढावी लागली. तर वालकिणी वसाहत क्रमांक 1, 2 व 3 तसेच भाटी येथील लोकांना वाडे फिडरवरून वीजपुरवठा करण्यात आला, अशी माहिती मिळाली.
धोकादायक झाडे कापण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, वरील झाडाचा बुंधा आगीची झळ पोहोचून जळाला होता. गेल्या वषी याच रस्त्याबाजूची गुलमोहराची अनेक झाडे पावसाळय़ात कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी नागरिकांकडून रस्त्याच्या बाजूची धोकादायक बनलेली झाडे तोडण्याची मागणी झाली होती. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाले. असे प्रकार यापुढे घडू नयेत म्हणून सरकारने याची दखल घेऊन पावसाळय़ापूर्वी वालकिणी आणि भाटी भागांतील धोकादायक झाडे कापून टाकावीत, अशी मागणी होत आहे. संबंधितांनी तसे आदेश स्थानिक पंचायतींना देण्याची मागणीही होत आहे.