काँग्रेस सरचिटणीस जनार्दन भंडारी यांचे पोलिसांना निवेदन
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील गुळे येथे हमरस्त्यावर एका मालवाहू वाहनाच्या धक्क्याने बळी गेलेल्या गुरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसने केली असून पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी त्यासंबंधीचे एक निवेदन काणकोणच्या पोलीस स्थानकावर दिले आहे.
भटक्या जनावरांची समस्या सोडविण्याच्या बाबतीत भाजपा सरकारला अपयश आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी प्राणी कल्याण मंडळाची स्थापना करण्याचा आदेश प्रत्येक राज्याला दिला होता. गोव्यात देखील 2013 साली भटकी जनावरे व्यवस्थापन योजनेची घोषणा करण्यात आली होती. मात्र निधीच्या अभावी ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. सध्याच्या कोरोना महामारीमुळे एकंदरच शेतकरी हवालदिल झालेला असून कर्जबाजारी झाला आहे. आपल्या गुरांची योग्य ती काळजी घेणे त्याला अशक्य झालेले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांप्रमाणे गोव्यातील शेतकऱयांवर देखील आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते, असे भंडारी यांनी म्हटले आहे. त्यातच कायद्याच्या भीतीने गुळे येथील रस्त्यावर ज्या 11 गुरांचा बळी गेला त्यांचे मालक पुढे आलेले नाहीत. सरकारने भटक्या जनावरांसाठीची व्यवस्थापन योजना चालीस लावताना कोंडवाडे सुरू करावेत आणि कोंडवाडय़ांतील रक्षकांसाठी अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, गुळे ते माशेपर्यंतचा मनोहर पर्रीकर बगलमार्ग वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनलेला आहे. दिवसाआड एक तरी अपघात या रस्त्यावर सध्या व्हायला लागला आहे. या रस्त्यावरील पथदीप पेटत नाहीत आणि त्यामुळेच भटक्या गुरांना अपघात होत असल्याचे या ठिकाणी बोलले जाते. काणकोणच्या पोलिसांनी 24 तास या रस्त्यावर टेहेळणी करावी आणि सरकारने त्यासाठी अतिरिक्त वाहनांची तरतूद करावी, अशी मागणी भंडारी यांनी केली आहे.