मंगळवारी रिमझिम पाऊस, फयानच्या पुनरावृत्तीचे भय
प्रतिनिधी/ गुहागर
कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळाच्या सावटामध्ये गुहागरमध्ये मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळापासून सतर्क राहण्यासाठी गुहागरच्या आपत्ती व्यवस्थापनाने तालुक्यातील 51 गावांमधील तब्बल 1196 लोकांचे स्थलांतरण केले आहे.
तालुक्यातील वेलदूर, नवानगर, अंजनवेल, गुहागर, असगोली, पालशेत, कोंडकारूळ, वेळणेश्वर, तवसाळ, रोहिले, कुडली आदी समुद्रकिनारपट्टीलगत असलेल्या गावांमधील पाच किलोमिटर अंतरापर्यंत क्षेत्र या चक्रीवादळापासून बाधित क्षेत्र धरण्यात आले आहे. अशा 51 गावांची नोंद गुहागरच्या आपत्ती निवारण कक्षाने केली आहे. या गावांमधील धोकादायक असलेल्या घरांमधील 1196 लोकांना इतर घरामध्ये स्थलांतरीत होण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याप्रमाणे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती गुहागरच्या आपत्ती निवारण कक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गावातील तलाठी, ग्राम कृती दलामार्फत त्या त्या गावातील गरोदर मातांना सुरक्षित स्थळी अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थलांतरीत होण्याच्या सूचना तहसीलदारांच्यावतीने देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात चक्रीवादळाबाबत स्पिकरद्वारे माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
फयानच्या पुनरावृत्तीचे भय
चक्रीवादळाचा तडाखा हा फयान वादळाप्रमाणेच असल्याचे बोलले जात असल्याने गुहागरवासियांच्या मनात फयान वादळाचे भय पुन्हा जागृत झाले आहे. फयानचा सर्वाधिक फटका हा गुहागर तालुक्याला बसल्याने त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती गुहागरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. फयान वादळापूर्वीच्या वातावरणाप्रमाणेच मंगळवारी वातावरण दिसून येत होते. यामुळे तालुक्यातील जनता अधिक सतर्क झाली आहे.