महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कडून जेसीबीद्वारे पाडली दुकाने
गुहागर / प्रतिनिधी
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या दुकानांवर अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड रत्नागिरी यांच्यावतीने सर्व दुकाने पाडून कारवाई करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील एकूण 23 अतिक्रमण असणारी दुकाने मंगळवारी जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आली.
गुहागर समुद्रकिनारी भेल पुरी सेंटर, चायनीज, आईस्क्रीम, जेवण, नारळ पाणी यासारखी एकूण 23 दुकाने छोट्या व्यवसायिक उभारून पर्यटकांना सेवा देत होते. सदर दुकाने उभारताना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे 2011 पासून सदर दुकाने काढण्यात यावी. अशा प्रकारची नोटीस महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्यावतीने देण्यात येत होती. 29 सप्टेंबर रोजी पाच दिवसांची मुदत देऊन सदर अतिक्रमणे हटवावे अशी नोटीस ह्या सर्व दुकानदारांना आली होती.
त्यानंतर पुन्हा नोटीस देऊन 11 ऑक्टोबरपर्यंतची अतिक्रमणे हटवण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र दुकानदारांनी दुकाने न काढतात या कारवाईला स्थगिती द्यावी. यासाठी खेड न्यायालयात धाव घेतली होती. दुकानदाराने सादर केलेल्या या याचिकेची 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी दिलेली 11 ऑक्टोबरची अंतिम मुदत संपल्याने 12 ऑक्टोबर रोजी मंगळवारी अतिक्रमण हटाव या अंतर्गत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे कॅप्टन संजय उगलमुगले, डी वाय एस पी सचिन बारी, यांच्या उपस्थितीत गुहागर पोलीस व जोडीला रॅपिड फोर्स बोलावून जेसीबीच्या साह्याने सर्व अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली. दुकानदाराने आपल्यावर कारवाई होणार हे निश्चित असल्याचे समजल्यावर, आपापले साहित्य बाहेर काढावयास सुरुवात केली.
साहित्य बाहेर काढून झाल्यानंतर सर्व दुकाने जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात येत आहेत. गुहागर पर्यटनामध्ये समुद्रकिनाऱ्यावरील ही छोटी स्नॅक सेंटर पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होती. याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत होता. मात्र दिवाळी सण जवळ आला असताना, त्याचबरोबर कोविड निर्बंधातून शिथिलता आली असताना, पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर गुहागरकडे ओघ वाढणार आहे. अशावेळी समुद्रकिनाऱ्यावरील ही सर्व स्नॅक्स सेंटर कारवाई करत काढण्यात आल्याने पर्यटकांना गैरसोयीना सामोरे जावे लागणार आहे.