ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुगलचा सहावा ‘गुगल फॉर इंडिया इव्हेंट 2020’ आज पहिल्यांदाच व्हर्च्युअल पद्धतीने पार पडला. यावेळी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.
ते म्हणाले, पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक भागीदारी, ऑप्रेशन्स आणि डिजीटलायझेशन संदर्भातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित असणार आहे.
तसेच भारतातील ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल बनवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग केला जात आहे. पुढे ते म्हणाले, केवळ दोन आठवड्यात गुगल पे च्या माध्यमातून पी एम केअर फंडात 120 कोटी रुपये जमा झाले आहेत. भारतात 26 मिलियन लहान मोठे उद्योग गुगल वर सर्च केले जातात.
या कार्यक्रमात बोलताना गूगल इंडियाचे हेड संजय गुप्ता म्हणाले की, गूगल भारतात इतके स्मार्ट झाले आहे की, हवामानाबाबत 24 तास आधीच अचूक भविष्यवाणी करु शकतो. तसेच आतापर्यंत कोरोना संदर्भात भारतात 2 अरब पेक्षा अधिक लोकांनी सर्च केले असून त्यांची सर्व उत्तरे गूगलकडून देण्यात आली आहेत.
यावेळी केंद्रीय मनुष्यबळ संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुगलने भारतामध्ये डिजिटल क्रांतीसाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले, डिजिटल भारत समोर येणाऱ्या अडचणींचा यशस्वीपणे सामना करेल. श्रेष्ठ भारत बनवण्यासाठी आम्ही स्टार्ट अप, स्टॅन्ड अप आणि डिजिटल आदी मार्गांचा अवलंब करू व यामध्ये यशस्वी होऊ. तसेच सीबीएसईच्या 10 लाख शिक्षकांना गुगलकडून निःशुल्क प्रशिक्षण देण्याच्या योजनेचे यावेळी कौतुक केले.