एकदा गृहकर्ज मंजूर झालं की कर्जदाराला महिन्याला हप्ता भरावा लागतो. कर्जाची एकूण रक्कम व्याजासह समान मासिक हप्त्यामध्ये रूपांतरीत केली जाते. पण काही वेळा अपघातामुळे किंवा नोकरी गमावल्यामुळे हप्ते भरणे होत नाही. आपण वेळेवर हप्ते भरत असता तोवर सगळं ठिकठाक असतं. पण हप्ते बंद केले जातात तेव्हा काय करावं हे पाहुया या लेखात.
स्वत:चं घरकुल असावं अशी सुप्त इच्छा प्रत्येकाचीच असते. पण हे साऱयांनाच जमणं शक्य नसते. आजच्या महागाईच्या जमान्यात घर उभारणं म्हणजे पैशाची मोठी तरतूद करावी लागते. आयुष्यभर जमवलेली पुंजी हक्काच्या घरासाठी खर्ची घालावी लागते. काहीवेळा असे करूनही घरासाठी पैसे कमी पडतात. मग त्यांना उर्वरीत पैशासाठी गृहकर्ज घेणे आवश्यक वाटते. स्वत:चं घर साकारण्यासाठी आजकाल सर्रासपणे गृहकर्ज घेतलं जातं. त्यासाठी वित्तसंस्था, बँका यांचा विचार केला जातो. एकदा का गृहकर्ज मंजूर झालं की कर्जदाराला महिन्याला हप्ता भरावा लागतो. कर्जाची एकूण रक्कम व्याजासह समान मासिक हप्त्यामध्ये रूपांतरीत केली जाते. पण काही वेळा अपघातामुळे किंवा नोकरी गमावल्यामुळे हप्ते भरणे होत नाही. आपण वेळेवर हप्ते भरत असता तोवर सगळं ठिकठाक असतं. पण हप्ते बंद केले जातात तेव्हा काय करावं हे पाहुया या लेखात.
आपण एकच महिन्याचा हप्ता चुकवलात म्हणून काही बँका आपल्याला लगेचच दोशी धरत नाहीत. आपण तीनवेळा हप्ता चुकवलात तर यासंबंधीची सूचना बँका आपल्याला वेळोवेळी कळवत असते. पण आपण या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास मात्र बँका शेवटी तुम्हाला कायदेशीर नोटीस बजावू शकतात. आपण कर्ज बुडवणारे म्हणून आपल्यावर पुढील कारवाई करण्यासाठी बँक सज्ज होते. आपल्या मालमत्तेवर ताबा मिळण्याच्यादृष्टीने बँक पुढील कार्यवाही अवलंबते. आपला फ्लॅट किंवा घर लिलाव प्रकियेतून शिल्लक कर्जाची रक्कम बँक जमा करून घेते. आपल्याला यापूर्वी आपली बाजू मांडायची असेल तर लिलावाआधी कार्यवाही पार पाडावी लागते. आपल्या अशा वागण्यामुळे बँक आपल्याला भविष्यासाठी कर्ज घेण्यासाठी अपात्र ठरवू शकते.
अशावेळी आपल्याला पुढं होऊन बँकेशी चर्चेतून व्यवहार करता येतो. बँकही आपल्या समस्येवर बोलायला तयार असते. आपण यापूर्वीच्या कर्जाच्या जे पूर्णपणे भरलेले असेल त्याचा दाखला किंवा नियमीत भरलेले कर्जाचे हप्ते दाखवू शकता.
अशावेळी आपण बँकेकडे कर्ज फेडण्यासाठी जादा कालावधी मागून घेऊ शकता. समान मासिक हप्ते भरण्याची हमी देऊन असे करता येते. आपण सध्या हप्ते का भरत नाही आहात याचे सबळ कारण बँकेला सांगणं अधिक संयुक्तिक ठरणारं असेल. नोकरी गमावणे किंवा अपघात होणे ही कारणे असतील ती सांगून बँकेकडून जादा कालावधी दंडासह घेता येतो का ते बघावे.
कर्जाचे व्याजदर वाढलेने आपल्याला इएमआय भरणे जड जाते. अशावेळी आपल्याला बँकेशी बोलून कर्जाची पुनर्रचना करून घेता येते. कर्जासाठी कालावधी वाढवून मिळतो का बघावे, याने आपला इएमआयचा हप्ताही कमी होतो. मालमत्ता गमावण्यापेक्षा असे केलेले कधीही बरे असते.
सल्लागार केंद्रांची मदत अशावेळेला उपयुक्त ठरू शकते. आपली सध्याची परिस्थिती पाहून त्याप्रमाणे विविध पर्याय आपल्यासमोर ठेवले जातात. आपल्याला या अडचणीतून सर्वकषपणे बाहेर काढण्यासाठी हे केंद्र मदत करू शकते.
या साऱयातून मार्ग काढण्यासाठी आणखी एक पर्यायही आहे. आपण आपली गुंतवणूक मोडून आवश्यक ती कर्जाची रक्कम भरू शकतो. ठेवी किंवा इतर गुंतवणूक असल्यास ती मोडता येते. इएमआयसाठी त्याचा विनीयोग करता आला तर जरूर करावा.
अशा वरील विविध पर्यायांचा विचार करता येतो. यातूनही आपण 5 ते 6 महिन्याच्या खर्चाची रक्कम बाजूला काढून ठेवणे आवश्यक ठरणारे असेल. संकटकाळी ही रक्कम उपयोगी ठरेल. त्याशिवाय आपण वैयक्तिक आरोग्य विमा आणि गंभीर आजारासंबंधीची पॉलिसी घेतलेली असावी.