ऑनलाईन टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहलेल्या पत्रानंतर राज्यात खळबळ उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील उपस्थित होते. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. फडणवीस यांच्या काळातही अनेकांवर आरोप झाले. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही, असे पाटील म्हणाले. त्यामुळे भाजप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत असला तरी आघाडी सरकार अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे दिसत आहे.
तत्पूर्वी, शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते कमलनाथ यांनी पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील स्थितीबाबत चर्चा केली.