वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविणाऱया मिराबाई चानूचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय बाळगावे, असे आवाहन अमित शहा यांनी मिराबाई चानूला केले.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 27 वषीय मिराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिल्यानंतर तिची मणिपूर शासनातर्फे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. केंद्रीय शासनाच्या पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोतर्फे 51 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते मणिपूरच्या मिराबाई चानूचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
मिराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिल्याने त्याचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. पोलीस दलातील प्रत्येक सदस्याला ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे शहा यांनी यावेळी म्हटले. परिश्रम आणि समर्पण या दोन गोष्टींमुळेच मिराबाई चानूला हे यश संपादन करता आले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मिराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात पहिल्याच दिवशी भारताचे पदक तक्त्यामध्ये खाते उघडले होते.