ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ वाचनात वारकरी दंग : घरोघरी भजन-कीर्तनावरही भर
सुकृत मोकाशी / पुणे
आषाढीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी । तीर्थव्रत ।।
अशा भावभक्तीत पंढरीच्या वारीत आपली सेवा समर्पित करणाऱया वारकऱयांना यंदा पंढरीच्या वाटेपासून वंचित राहावे लागले आहे. मात्र, तरीही घरोघरी भजन, अभंगाचे नाद गुंजत असून, गृहमंदिरातच विठूभक्तीचा सोहळा रंगलेला पाहायला मिळत आहे.
पालखी सोहळा म्हणजे जणू वारकऱयांसाठी दसरा-दिवाळीहून आनंदाचा सणच. दरवर्षी टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये लाखो वारकरी या सोहळय़ात सहभागी होतात. विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन पंढरीची वाट सहजसुलभ करणाऱया वारकऱयांना यंदा कोरोनाच्या संकटामुळे या सोहळय़ाचे साक्षीदार होता आलेले नाही. वारीचा नेम चुकला असला, तरी वारकरीपण मात्र कायम असल्याचे चित्र आहे.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी ‘तरुण भारत’ने संवाद साधला असता ते म्हणाले, वारकरी सर्वसमावेशक आहेत. पालखी सोहळा, दिंडी सोहळा असे दोन प्रकार असतात. कोरोनामुळे यंदा दिंडी सोहळय़ाला मुकावे लागले. दिंडय़ा-दिंडय़ातून घुमणारा वारकऱयांचा नाद यंदा अनुभवता आलेला नाही. किंबहुना, देहाने नाही; तर मनाने पाडुरंगापर्यंत पोहोचण्याकरिता दिंडीत जे उपक्रम सुरू असतात, तेच उपक्रम वारकरी आपापल्या घरी करत आहेत. 200 ते 250 वारकरी ज्ञानेश्वरीचे पारायण घरातच करीत आहेत. हरिपाठाचेही वाचन सुरू आहे. ज्ञानेश्वरीचे पारायण केले, की मनाने पांडुरंगापर्यंत जाता येते. फेसबुकवरूनही भजन, चिंतन यातून शब्दांचा सोहळा सुरूच आहे. कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे. वारकऱयांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय आहे, असेही देखणे यांनी नमूद केले.
संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, कोरोनासारख्या भयानक साथीच्या रोगामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे पालखी सोहळा रद्द करावा लागला आहे. असे असले, तरी वारकऱयांच्या भक्तीत कोणताही खंड पडलेला नाही, पडणार नाही. फेसबुकच्या माध्यमातून मीदेखील वारीविषयी माहिती देत आहे. 4 ते 5 दिवस हा उपक्रम चालणार आहे.