राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याचे वडील म्हणजेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना केंदीय मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे केली आहे. राहुल गांधींसह प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, ए. के. ऍन्टोनी या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी अजय मिश्रा हे केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदी असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अशक्मय असल्याचा मुद्दाही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. लखीमपूर हिंसाचारातील पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन काँग्रेस शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली होती. भेटीनंतर शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत आपल्या मागण्यांसंबंधींची भूमिका विषद केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली असून त्यांनीही अजय मिश्रा यांना मंत्रिपदावरून हटवण्याची अपेक्षा आपल्यासमोर व्यक्त केली होती, असे प्रियांका गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अन्य नेतेही यावेळी उपस्थित होते.
राकेश टिकैत यांचाही इशारा
लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या अटकेनंतर संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाने आवाज बुलंद करण्याची घोषणा शनिवारी केली. 12 ऑक्टोबरपासून संयुक्त किसान मोर्चाने ‘कलश यात्रा’ सुरू केली आहे. ही ‘कलश यात्रा’ उत्तर प्रदेशातील सर्व जिह्यांमध्ये जाणार आहे. तसेच 18 ऑक्टोबरला ‘रेल रोको’ आंदोलन आणि 26 ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये ‘महापंचायत’ घेतली जाणार आहे.
आशिष मिश्राची चौकशी युद्धपातळीवर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याची गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाद्वारे चौकशी सुरू आहे. न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याला सध्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शेतकऱयांच्या मृत्यू प्रकरणातील आशिष मिश्राचा सहभाग तपासण्याचा प्रयत्न अधिकाऱयांकडून केला जात आहे.