प्रतिनिधी/ कराड
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊन सुरू आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सायंकाळी कराड शहरात फिरून लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे याची पाहणी केली. कराडकरांनी शासनाच्या आदेशाचे शंभर टक्के पालन केल्याबद्दल त्यांनी कराडकरांचे आभार मानले.
कोल्हापूर नाका, दत्त चौक, बाजारपेठ, मंगळवार पेठेसह परिसरात मंत्री देसाई यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, राज्यातील जनतेने लॉकडाऊनचे काटेकोरपालन केले आहे. कराड शहरासह तालुक्यातही कडक लॉकडाऊन आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार आता जनतेने केल्याचे दिसत असून शासनाच्या नियमांचे पालन सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी हे करत आहेत. त्यांच्यावरही संकट असताना ते संयम ठेवून शासनाच्या बरोबरेने कोरोना विरूद्धच्या लढय़ात उतरले आहेत. याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कोरोनाची साखळी तुटून आपण सर्व सुरक्षितपणे पुन्हा दैनंदिनी सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील राहूयात.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, विजय गोडसे यांची उपस्थिती होती.