लखीमपूर खेरी हत्याकांडप्रकरण : लखनौ खंडपीठाकडून दिलासा
लखनौ / वृत्तसंस्था
लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मिश्राला दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्या. राजीव सिंह यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर 18 जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यावर गुरुवारी निर्णय जाहीर करण्यात आला.
लखीमपूर खेरी जिल्हय़ातील तिकोनिया गावात मागील वषी 3 ऑक्टोबर रोजी आंदोलक शेतकऱयांना कारखाली चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे. हे शेतकरी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान गोळीबार करण्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे. शेतकऱयांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेत एका पत्रकारासह 8 जणांचा मृत्यू झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी आशिष मिश्रासह 13 जणांना अटक झाली होती.
एसआयटीकडून 5 हजार पानी आरोपपत्र
हिंसाचाराची घटना घडल्यानंतर एसआयटीने तब्बल तीन महिन्यांनंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याच्यासह नातेवाईक विरेंद्र कुमार शुक्लाचे नाव आहे. विरेंद्र याच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने 5,000 पानी आरोपपत्र दाखल करत ही घटना सुनियोजित कट असल्याचा दावा केला होता.