ऑनलाईन टीम / मुंबई :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थ्यांचे सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्रीपासून हे विद्यार्थी ठाण मांडून बसले होते. आज सकाळी या आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांची आझाद मैदानावर रवानगी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
गेट वे ऑफ इंडियावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्यातच या आंदोलकांची गर्दी त्यामुळे मुंबईकरांनाही त्रास होत होता. रस्त्यावर देखील यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आंदोलनाची जागा बदलण्याची विनंती केली होती. पोलिसांनी आज सकाळी आंदोलनकर्त्यांची धरपकड करुन त्यांची आझाद मैदानावर रवानगी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
गेटवेवर आमच्या आंदोलनाचा कोणालाही त्रास होत नव्हता तरी देखील आम्हाला पोलिसांनी आझाद मैदानावर आणले. आम्ही हे आंदोलन मागे घेत असलो, तरी आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहणार असल्याचे एका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले.