ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यातील पराभवानंतर अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे प्रतिपादन
मोहाली / वृत्तसंस्था
‘आम्ही ज्याप्रमाणे रणनीती आखली होती, त्याप्रमाणे त्याचा व्यवस्थित अंमल करु शकलो नाही आणि गोलंदाजीतही स्वैर मारा केल्याचा आम्हाला फटका बसला’, अशी स्पष्ट कबुली भारतीय अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 4 गडय़ांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता.
येथील पंजाब क्रिकेट संघटनेच्या मैदानावर 208 धावांचा डोंगर रचल्यानंतरही भारताला गोलंदाजांच्या अपयशाचा फटका बसला. भारतीय संघ आता 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 0-1 फरकाने पिछाडीवर आहे.
‘डय़ू फॅक्टर अजिबात नव्हता. तरीही, आक्रमक फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ प्रशंसेस पात्र आहे. आम्ही आमची रणनीती अंमलात आणू शकलो नाही. गोलंदाजी काटेकोर करु शकलो नाही’, असे पंडय़ा त्यावेळी म्हणाला. हर्षल पटेलचे 18 वे महागडे षटक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. पण, पंडय़ाने कोणताही एकच घटक पराभवासाठी कारणीभूत धरणे रास्त ठरणार नाही, अशी भूमिका मांडली.
‘अगदी ऑस्ट्रेलियाने देखील षटकात 24-25 धावा मोजल्या. द्विदेशीय मालिकेत असे चढउतार होत असतात. सरस कामगिरी साकारणे हा यावर पर्याय ठरु शकतो. कॅमेरॉन ग्रीनच्या खेळीचे मात्र विशेष कौतुक करायला हवे. वास्तविक, आम्ही त्याच्या खेळीचे अनेक व्हीडिओ पाहिले होते. पण, रणनीती अंमलात आणता आली नाही, त्याचा आम्हाला फटका बसला’, असे पंडय़ा याप्रसंगी म्हणाला.
‘प्रत्येक पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करणे यावर माझा भर असतो. काही वेळा ज्याप्रमाणे उत्तम फटकेबाजी करु शकलो, त्याचप्रमाणे काही वेळा अगदी शून्यावर देखील बाद झालो आहे. आणखी सरस खेळ कसा साकारता येईल, यावर माझे अधिक लक्ष केंद्रित असते’, याचाही या दिग्गज खेळाडूने उल्लेख केला.
स्पीडस्टार जसप्रित बुमराहला पुरेसा वेळ द्यावा लागेल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात जसप्रित बुमराहची उणीव भारतीय संघाला प्रकर्षाने जाणवली होती. अगदी 209 धावांचेही संरक्षण न करता आल्याने संघातील गोलंदाजांच्या मर्यादा प्रकर्षाने चव्हाटय़ावर आल्या. मात्र, हार्दिक पंडय़ाने बुमराहवर अधिक दडपण न टाकता त्याला पुनरागमनासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल, असे स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर जोरदार हल्ला चढवत 209 धावांचे आव्हान सहज सर केले आणि अक्षर पटेलचा अपवाद वगळता अन्य सर्व गोलंदाजांनी षटकामागे 11 पेक्षा अधिक सरासरीने धावांची लयलूट करु दिली. यापूर्वी पाठदुखीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू न शकलेला बुमराह आगामी टी-20 वर्ल्डकप व ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी संघात समाविष्ट आहे.
‘बुमराह अर्थातच संघातील महत्त्वाचा घटक आहे. तो उपलब्ध असताना मोठा फरक पडतो. त्याची गोलंदाजी बलस्थान असते. मात्र, तो आता दुखापतीतून सावरत पुनरागमन करत आहे आणि त्याला यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज आहे’, असे पंडय़ा तपशीलवार बोलताना म्हणाला.
मॅथ्यू वेड म्हणाला, इंडियन कंडिशन्समध्ये यॉर्कर्सचाही समाचार घेता येतो!
इंडियन कंडिशन्समध्ये खेळत असताना अगदी चांगले चेंडू देखील सहजपणे सीमापार टोलवता येतात आणि यामुळे धावांचा पाठलाग करताना संयमावर भर दिला तर येथे सहज यश मिळवता येते, असे ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडने नमूद केले. कॅमेरॉन ग्रीनने 30 चेंडूत 61 धावांची बरसात केल्यानंतर मॅथ्यू वेडने अवघ्या 21 चेंडूत 45 धावांची धुवांधार खेळी साकारत संघाला दणकेबाज विजय संपादन करुन दिला.
वास्तविक, ऑस्ट्रेलियासमोर शेवटच्या 4 षटकात 55 धावा फटकावण्याचे कठीण आव्हान होते. पण, मॅथ्यू वेडने जवळपास प्रत्येक चेंडू सीमापार टोलवण्यावर भर देत विजयाचे लक्ष्य साधण्यात सिंहाचा वाटा उचलला. अनुभवामुळे माझ्या खेळात बरीच प्रगल्भता आली असून धाडसी फटके मारण्यात मी घाई करत नाही, असे तो याप्रसंगी म्हणाला.
‘आवश्यक सरासरी आपला फलंदाजीतील दृष्टिकोन कसा असावा, हे दर्शवत असते. भारतातील मैदानांचे एकंदरीत स्वरुप असे आहे की अगदी चांगले यॉर्कर्स देखील सीमापार टोलवता येतात आणि या आधारे गोलंदाजावर दडपण आणता येते. पहिल्या टी-20 सामन्यात हेच घडले. त्यांनी उत्तम यॉर्कर्स टाकले आणि त्यानंतरही मी ते यॉर्कर्स सीमापार टोलवण्यात यशस्वी ठरलो’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.