केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यावेळी कोरोना उदेकाची तीव्रता अधिक असली, तरी केंद्र सरकारची सज्जता मागच्या वर्षीच्या कोरोना उद्रेकाच्या कलावधीपेक्षा जास्त आहे. मागच्या वर्षी या रोगाची विशेष माहिती नव्हती. तसेच लस किंवा औषधांचे संशोधनही झाले नव्हते. त्यामुळे सज्जता राखण्यासाठी दिशा मिळत नव्हती. मात्र यंदा अशी स्थिती नाही. केंद्र सरकार गेल्यावेळेपेक्षा जास्त प्रमाणात सज्ज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकारांशी चर्चा करताना केले.
त्यांच्या हस्ते मंगळवारी पंजाबमधील एका रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. या शिबिरासारखीच अन्य तेरा शिबिरे या राज्याच्या विविध शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. सध्याच्या आव्हानात्मक काळात रक्तदान हे पवित्र कर्तव्य ठरणार आहे. त्यामुळे रक्तदान करण्यास पात्र असणाऱया प्रत्येकाने ते करून राष्ट्राला साहाय्य केले पाहिजे. सध्याच्या घडीला रक्ताची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात काही प्रमाणात प्राणवायूची कमतरता सुरवातीच्या काळात होती. तथापि, आता वितरण सुरळीत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. लवकरच पुरवठा सुलभ होऊन कोरोनाच्या प्रसाराचा वेगही कमी होईल. कोणीही धीर सोडता कामा नये, असे प्रतिपादनही त्यांनी या कार्यक्रमात केले. हा कार्यक्रम वेबीनारच्या माध्यमातून प्रत्यक्ष उपस्थितीविना घेण्यात आला होता.