सातारा
गेल्यावर्षी मार्चमध्ये पूर्ण लॉकडाऊन अनुभवला तर दुर्दैवाने यंदाच्या मार्चमध्ये हाफ लॉकडाऊन अनुभवा लागणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी सोमवारी 1 ते 31 मार्चपर्यंत हाफ लॉकडाऊन घोषीत केला. यात संचारबंदी कायम असून आता दुकाने व सर्व मार्केट सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंतच सुरु राहील. पाचवी ते बारावीची शाळा सुरू राहतील मात्र महाविद्यालये बंद राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा कठोर झालेल्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्हय़ात रात्रीची संचारबंदी करण्यात आली होती व या कालावधीतील परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्याबाबतचे संकेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यावेळीच दिले होते. गेल्या काही दिवसात वाढत असलेले बाधित वाढ पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक महिन्याचा लॉकडाऊन पुकारला आहे. हा आदेश 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
या नवीन आदेशानुनसार रात्री 11 ते सकाळी 6 संचारबदी कायम ठेवण्यात आली असून आता सर्व मार्केट, दुकाने, हॉटेल्स, सार्वजनिक कार्यक्रम सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत नियम पाळून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. मेडिकल, आरोग्य सेवा व इंधन सेवा 24 तास राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, मास्क नसल्यास, सोशल डिस्टन्स न पाळल्यास दंड करण्यात येणार असून वाहनांमध्ये प्रवास करताना देखील सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे लागणार आहेत. तसेच आरोग्यदूत ऍप वापरणे बंधनकारक आहे.
या बाबींना आहे मनाई
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिय़ूट बंद राहतील तर कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिटय़ुट, तसेच इयत्ता 5 ते 12 चे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू राहतील. ऑनलाईन, शिक्षणास परवानगी राहील, ऑनलाईन शिक्षण, दूरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना परवानगी राहील.
मेडिकल, आरोग्य, इंधन 24 तास
जिह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पूर्णवेळ ठेवण्यास परवानगी राहील. यामध्ये मेडिकल दुकाने सोशल डिस्टन्सचे नियम पाळून तसेच आरोग्य सेवा, दवाखाने, हॉस्पिटल्स, पेट्रोल, डिझेल पंप 24 तास राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱया बाबींनी कोरोना संसर्गातील नियमांचे पालन करुन या सेवा, सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी लागू
रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोस्युजर नुसार चालू राहील. मात्र, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने तसेच मोठय़ा संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा यांना पूर्णपणे महिन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे.
खालील बाबींना परवानगी राहील
हॉटेल, फुड कोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बारर्स् यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी आहे, मात्र, नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. ऑक्सीजनची वाहतूक करणाऱया वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे. सर्व मार्केट, दुकाने, केश कर्तनालय, स्पा, सलुन, व्युटी पार्लर, जिह्यातील सर्व सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र, बाग, उद्याने आणि स्वीमिंग, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेंज इ. मधील सर्व खेळ, करमणुकीच्या उद्देशाने सार्वजनिक मोकळ्या जागा सकाळी 9 ते सायंकाळी 9 सुरु राहतील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप (घरपोच वितरणासह) करण्यास परवानगी देण्यात येत आहे
लग्न समारंभास 100 लोकांना परवानगी
सातारा जिह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 100 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी, वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करण्याकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. अत्यंविधी यासारख्या कार्यक्रमास 20 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झाल्यास दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी, तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱया व्यक्तींवर 500 रु. दंड आकारावा. खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून थुंकल्यास 1000 रु. दंडा आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्येय एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी रु. 2000/- व शहरी भागासाठी रु. 3000/- दंड आकारावा.
कामाच्या ठिकाणी नियम पाळणे आवश्यक
शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल क्रिनिंग, हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरातील सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थपना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याच्या वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.