राजस्थानमध्ये फेरबदल – आज नवे मंत्री शपथबद्ध होणार
जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामे दिले आहेत. काँग्रेस हायकमांडने गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेऊन पुढील शपथविधी सोहळय़ाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. आता रविवारी दुपारी नव्या मंत्र्यांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी, सर्व आमदारांना दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेस कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाला मान्यता देत हायकमांडने सूत्र निश्चित केले आहे. 2023 च्या निवडणुकीतील फायदे लक्षात घेऊन हा फेरबदल करण्यात येत आहे. या सूत्रानंतर गेहलोत मंत्रिमंडळाची नव्याने स्थापना होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात सचिन पायलट गटातील 4 ते 5 मंत्री होण्याची शक्मयता आहे. त्यानुसार मुरारीलाल मीना, दीपेंद्र सिंह शेखावत, ब्रिजेंद्र सिंह ओला, हेमाराम चौधरी, रमेश मीणा यांची नावे चर्चेत आहेत. तसेच गेहलोत सरकारमध्ये सध्या 13 जिह्यांतून एकही मंत्री नसल्याने जिल्हानिहाय ‘न्याय’ देण्याचा प्रयत्नही राहणार आहे. उदयपूर, प्रतापगढ, डुंगरपूर, भीलवाडा, श्री गंगानगर, हनुमानगड, चुरू, झुंझुनू, सिरोही, ढोलपूर, टोंक, सवाई माधोपूर आणि करौली जिल्हय़ांना यापूर्वीच्या मंत्रिमंडळात न्याय देण्यात आला नव्हता. या जिल्हय़ांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.
जुन्यांना डच्चू, नव्यांना संधी
गोविंद सिंग दोटासरा, हरीश चौधरी आणि रघु शर्मा या तिघांनी सुरुवातीला राजीनामे दिले होते. त्यांच्या जागी नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. त्यानुसार दोन जाट आणि एका ब्राह्मण चेहऱयाला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. दोटासरा आणि हरीश चौधरी यांच्या जागी जाट चेहरे म्हणून रामलाल जाट, ब्रिजेंद्र सिंह ओला, हेमाराम चौधरी, नरेंद्र बुडानिया यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष महादेवसिंह खंडेला यांचेही नाव दावेदारांमध्ये आहे.
श्रेष्ठींच्या सूचनेनुसार राजीनामा- डोटासरा
पक्षाची एक पद एक व्यक्ती या परंपरेचा आणि शिस्त याचा विचार करून आम्ही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आमचा राजीनामा सोपवला आहे. तसेच पक्षात कोणतीही गटबाजी नसून नाराजीचा प्रश्नच नसल्याचे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गोविंदसिंग डोटासरा यांनी सांगितले.