बीटीपीने पाठिंबा काढल्याने राजकीय घडामोडींना वेग
जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानात काँग्रेसच्या गेहलोत सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पक्षाच्या (बीटीपी) दोन आमदारांनी काढला आहे. या आमदारांचा गेहलोत सरकारला पाठिंबा होता. या वर्षाच्या सुरुवातीला गेहलोत सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले, त्यावेळी या दोन आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्याने राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन आमदारांनी पाठिंबा काढल्याने काँग्रेसकडे बहुमत असले तरी काँग्रेससमोरील संकट वाढले आहे.
काँग्रेसवर नाराज असल्याने राजकुमार रोत आणि रामप्रसाद यांनी पक्षाचे अध्यक्ष महेश वसावा यांना काँग्रेसचा पाठिंबा काढण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला आहे. पायलट यांच्या बंडाच्यावेळी आणि राज्यसभेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेसशी संबंध तोडण्याची वेळ आल्याचे या दोन आमदारांनी सांगितले.
राज्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. आम्हांला मदत न करता काँग्रेसने धोका दिल्याने सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या काही जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. राजस्थानात एकूण 200 विधानसभेच्या जागा आहेत. आता गेहलोत सरकारकडे 118 आमदार आहेत. त्यात काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.