रिव्होल्युशनरी गोवा चे मनोज परब यांचा निर्धार : दै. तरुण भारतला कार्यकर्त्यांसह सदिच्छा भेट
प्रतिनिधी /पणजी
स्वःप्रसिद्धीसाठी लोकांना कडधान्य वाटून फुकटखाऊ, लाचार बनविण्यापेक्षा कायमस्वरुपी रोजगार, उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी करण्यावर आमचा भर असेल. त्यादृष्टीने आमचे प्रयत्नही चालू आहेत. मात्र त्या प्रत्येक कामाचा स्वतःच उदोउदो करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा आमचे कार्य पाहून लोकच आमची प्रसिद्धी करतील यावर आमचा विश्वास आहे, असे स्पष्ट मत रिव्होल्युशनरी गोवाचे प्रमुख मनोज परब यांनी व्यक्त केले.
मंगळवारी दै. तरुण भारत कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी केलेल्या वार्तालापासून परब यांनी वरील मत व्यक्त केले. काही राजकीय पक्षांमुळे लोक आळशी बनू लागले आहेत. त्यांना कष्ट करण्याचा कंटाळा येऊ लागला आहे, त्यांच्यात आळस रुजू लागला आहे. अशा लोकांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज मतदारांना भूलविण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही, कडधान्याच्या पिशव्याही नाहीत. हे सर्व क्षणिक, हंगामी आहे. आम्ही जे लोकांना देणार आहोत ते कायमस्वरुपी असेल. स्वकष्टाने कमावलेल्या पैशांतून शिजवलेल्या अन्नाची गोडी काय असते हे आम्ही त्यांना पटवून देणार आहोत. त्या दृष्टीने आमचे धोरण तयार आहे व लवकरच ते जाहीर करण्यात येईल, असे ते पुढे म्हणाले.
’आरजी’ ही आंदोलनातून उभी राहिलेली एक संघटना. आज आमच्याकडे 25 हजार क्रांतीकारी युवकांची फौज आहे. त्यामुळेच आम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच त्याला मान्यताही मिळणार आहे. आंदोलनातील आमच्या ओळखीतून लोक आमच्याशी जुळले गेले. आमची ध्येयधोरणे, कार्यपद्धती मान्य झाल्यामुळे रोज अनेक तरुण आमच्या संघटनेत सहभागी होत आहेत, अशी माहिती परब यांनी दिली.
मेळावलीतील आयआयटी प्रकरण आम्ही यशस्वी केले ते सुद्धा आंदोलनातील ओळखीमुळेच. आम्ही स्वतः मेळावलीत गेलो नव्हतो. तेथील चार युवक आमच्याकडे आले. आयआयटी आणि आयटीआय यातील फरक सुद्धा त्यांना माहीत नव्हता. परंतु आपल्या गावचे रक्षण करायचे हे ध्येय आणि ठाम निर्धार होता. त्याकामी आम्ही सहकार्य करावे, अशी त्यांची अपेक्षा होती व तसे आवाहन त्यांनी आम्हाला केले. त्यातूनच मेळावलीत आंदोलनाची ठिणगी पेटली व पुढे ते यशस्वीही झाले. या क्रांतीचे श्रेय ते चार युवक व गावातील लोकांना जाते. कारण त्यांनी वेळीच पुढाकार घेतला नसता तर आज त्यांच्या जमीनी गिळंकृत झाल्या असत्या, धनिकांच्या घशात गेल्या असत्या. त्यातून गावचे अस्तीत्वही धोक्यात आले असते. आम्ही त्यांना केवळ मदत केली, एवढेच, असे परब म्हणाले.
तेव्हापासून आम्हाला राजकीय ओळखही प्राप्त झाली. त्यामुळे आता विविध मतदारसंघांमधून आम्ही प्रतिनिधीत्व करावे, अशी मागणी घेऊन लोकच आमच्याकडे येत आहेत. वाळपई मतदारसंघात तर आमचे कार्य घरोघरी पोहोचले आहे. तेथे सर्व लोकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय सत्तरी, थिवी, उसगाव, पाळी यासारख्या अन्य कित्येक मतदारसंघातही आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले आहे. जवळजवळ प्रत्येक घरी भेटी दिल्या आहेत, अशी माहिती परब यांनी दिली.
’आरजी ही भाजपची बी टीम’ असे का संबोधले जाते? असे विचारता, तो आरोप पूर्णपणे चुकीचा आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे, असे ते म्हणाले. आम्ही ’बी टीम’ असतो तर तडीपार करण्यासारखे गंभीर गुन्हे आमच्यावर लादले गेले नसते. विद्यमान सरकारवर आमच्यापेक्षाही जहाल आरोप करणाऱयांवर कोणतीही कारवाई होत नाही, गुन्हे दाखल करणे वा तडीपार करणे तर दूरच, असा दावा परब यांनी केला.
प्रत्यक्षात निवडणूक लढविण्याचा विचार नव्हता. आम्हा सरकारला पर्सन ऑफ गोवन ओरीजीन (पोगो) विधेयक मंजूर करण्यास सांगितले होते. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. या विधेयकाद्वारे आम्हाला हक्क मिळाले असते तर आम्हाला रस्त्यावर यावे लागले नसते. या विधेयकावर सरकार भविष्यातही विचार होईल असे वाटत नाही. अशावेळी 2027 च्या निवडणुकीपर्यंत वाट पाहात राहिलो तर तोपर्यंत गोवा आणि गोंयकारांचे अस्तित्व संपुष्टात येईल, म्हणुनच येती विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार चालविला आहे. त्यात यश आल्यास आम्ही स्वतः हे विधेयक मंजूर करणार, असे परब यांनी सांगितले.
रिव्होल्युशनरी गोवाचे प्रत्येक कार्य हे अहिंसेच्या मार्गातून चालते. हिंसा आम्हाला मान्य नाही, आणि आम्ही कुणाला ती करूही देत नाही. तसेच आम्ही गुंडगिरी, दमदाटी करून पैसा गोळा करणाऱया अन्य कोणत्या राजकीय पक्षाची नक्कलही करत नाही. आमची ध्येयधोरणे वेगळी आहेत. आम्हाला लोकांचे सबलीकरण करायचे आहे. प्रत्येक गावाचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी तेथे नेते तयार करायचे आहेत, असे मनोज परब यांनी सांगितले.