स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांचा नागरिकांना फटका : गटारीमध्ये माती भरल्याने समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. कणबर्गी येथील गोकाक रोडशेजारील गटारीचे बांधकाम अर्धवट असल्याने काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी नागरिकांना घरातील पाणी काढण्यासाठी धावपळ करावी लागली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कणबर्गी परिसरातील विविध विकासकामे हाती घेण्यात आली होती. मागीलवषी गटारीचे बांधकाम करीत असताना काही नागरिकांची घरे कोसळली होती. त्या नुकसानग्रस्तांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. पण आता पुन्हा या गटारीचा फटका रहिवाशांना बसू लागला आहे. गटारीमध्ये माती भरल्याने पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी पाणी साचून काही नागरिकांच्या घरांमध्ये शिरले.
मठ गल्ली येथील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. पण याकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरत आहे. मठ गल्लीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित गटार नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पावसाचे पाणी काढण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागली. पावसाचे पाणी शिरल्याने बरेच नुकसान झाले आहे.