प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखा हुकूमशाही कारभार यापूर्वी चालला होता. वेळीच बदल झाला नसता तर गोकुळचा पांढरा हत्ती झाला असता, अशा शब्दांमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता ‘गोकुळ’मधील पू्र्वीच्या सत्ताधारी नेते मंडळीवर तोफ डागली. गोकुळमध्ये गेल्या महिन्यात सत्तांतर झाले असून सतेज पाटील – मुश्रीफ गटाची सत्ता आली आहे. त्यापूर्वी तीस वर्षाहून अधिक काळ गोकुळमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प या ठिकाणी अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम झाला. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. अमृत कलश सोहळा पूजनानंतर नेते मंडळीची गोकुळच्या अधिकारी मंडळीसोबत बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना लक्ष केले.
गेल्या दीड वर्षात गोकुळमध्ये २७५ कर्मचाऱ्यांची भरती केली. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा होता परंतु, त्यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून प्रशिक्षणाचा कालावधी दोन महिन्यांवर आणला. सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याऐवजी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी गोकुळमध्ये मनमानी कारभार केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.
गोकुळचा पांढरा हत्ती झाला असता : मुश्रीफ
गोकुळमध्ये वीस लाख लिटर दूध संकलन करायचे म्हणून कर्ज काढले. नोकर भरती केली. त्यामुळे नोकरावरील खर्च १३० कोटी रुपये होतो. वारणा, कृष्णा संगमनेरसह अन्य दुध संघाच्या पाच लाख लिटर दुध संकलनाच्या प्रकल्पावरील नोकरांचा पगार हा वीस कोटीच्या आसपास आहे. आणि गोकुळ दूध संघातील पगाराची रक्कम १३० कोटीवर गेली आहे. यापूर्वीच्या नेते मंडळींना दूध उत्पादकांनी भरपूर संधी दिली होती, त्यांनी सभासदाभिमुख कारभार करण्याची गरज होती. चुकीच्या कारभाराबद्दल यापूर्वीच्या मंडळींना लाज वाटायला पाहिजे होती. वेळीच बदल झाला नसता तर गोकुळचा पांढरा हत्ती झाला असता, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.