प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यात कोरोनाची धास्ती अद्याप कमी झालेली नाही. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्यास समुहा संसर्गाचा धोका अधिक गडद होवू शकतो अशी भीती व्यक्त करीत राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत. याबाबतचे आदेश अवर सचिव रमेश शिंगटे यांनी बुधवारी सायंकाळी काढले. चार दिवसापूर्वी तरुण भारतने या बाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. शासनाच्या या निर्णयामुळे गोकुळ, जिल्हा बँकेसह जिल्हय़ातील 3 हजार सहकारी संस्थांच्या विद्यामान संचालक मंडळास दिलासा मिळाला आहे.
कायदा काय सांगतो….
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 157 मधील 73 क क तरतुदीनुसार आपत्तकाली परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्यास राज्य सरकारला अधिकार आहेत. यानुसार कमीत कमी सहा महिने तर जास्ती जास्त एक वर्ष निवडणुका पुढे ढकलता येतात.