प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. सर्व नेत्यांनी एकजुटीने काम केल्यामुळेच मोठे यश प्राप्त झाले आहे. आता गोकुळ दुध संघ दुध उत्पादकांच्या मालकीचा करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येणार आहोत. कष्टकरी दुध उत्पादकांना आजपर्यंत त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला नाही. यापुढे त्यांना कष्टाचे फळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीबाजी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात तिन्ही मंत्र्यांचे रॅलीद्वारे दसरा चौकात आगमन झाले. महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर व डॉ डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी तिन्ही मंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सांगता समारंभात बोलतांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी 35 वर्षांच्या राजकीय वाटचालीत पहिल्यांदाच अशी विराट मिरवणूक काढल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्ष म्हणून गेलो. आणि मंत्री म्हणून परत आलो. ही अंबाबाईची कृपा आहे. आता आपल्याला समाजातील शोषित, वंचीत घटकाला न्याय देण्याचे बळ अंबाबाईने द्यावे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी शासकीय विश्रामगृहामध्ये जनता दरबार घेणार आहे. जनतेने जे काय प्रश्न आहेत ते आम्हाला सांगावे. ते प्रश्न जर सोडवले नाही तर आमच्या घरावर मोर्चा काढा. जे आश्वासन देतो त्याची नक्कीच पूर्तता करू.. अंबाबाई विकास आराखडा, शहराला निधी मिळण्याबरोबरच सर्वच प्रश्न मार्गी लावू. हा विजय विधान सभेचा, जिल्हा परिषदेचा आहे. गोकुळ संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा करायचा आहे. त्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत सहभाग घेणार आहे.यामध्ये नक्कीच यश मिळेल असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
जिह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार -मंत्री सतेज पाटील
मंत्री सतेज पाटील म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची विकेट घेतली. त्यानंतर जिल्हा पारिषदेची राहिलेली विकेटही घेतली. बजरंग पाटील यांनी 40 वर्षांची पक्षनिष्ठा ठेवली. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. मंत्री झाल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. थेट पाईपलाईन पाणी योजना पूर्ण करण्याला प्राधान्य राहील. जिह्याचा विकास करण्यासाठी, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी महिन्यातून एक दिवस शासकीय विश्रामगृहामध्ये जनता दरबार घेणार आहे. आगामी गोकुळच्या निवडणुकीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न, शाहू समाधी स्थळ आदी विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
दोन पिढय़ा राष्ट्रवादीत, तरीही अपक्ष लढण्याची वेळ -राजेंद्र पाटील-यड्रावकर
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, माझ्या दोन पिढय़ांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करूनही मला अपक्ष लढावे लागले. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्तेची परिस्थिती बदलली. निवडून आल्यानंतर मी शिवसेनेच्या पाठीशी राहिलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला. मला मंत्रिपद दिले. आगामी काळात मंत्री मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
‘आमच ठरलयं’ चा पॅटर्न राज्यभर गाजला- खासदार मंडलिक
यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, अंबाबाईच्या कृपेने जिह्याला तीन मंत्री मिळाले आहेत. तिन्ही मंत्री राज्यात चांगले काम करतील. जिह्याचे सर्व प्रश्न सोडवतील. प्रलंबित प्रश्नाबरोबर खंडपीठाचा प्रश्न, थेट पाईपलाईन योजना पूर्ण होईल. कोल्हापूरातील ‘आपलं ठरलंय’ पॅटर्न आता राज्यभर पोहोचला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगली वज्रमुठ बांधून विविध संस्थांमध्ये सत्ता मिळवू. आपला ठरलंय हे स्लोगन फक्त निवडणुकीपूरते न राहाता राजर्षी शाहूंचा विचार देशभर पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार मंडलिक यांनी व्यक्त केला. आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, महाविकासआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. त्यामुळे कोल्हापूर जिह्याला तीन मंत्रीपदे मिळाली. हे तिन्ही मंत्री जिह्याचा चांगला विकास करतील. यावेळी महापौर सुरमंजिरी लाटकर यांनी आभार मानले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, राजीव आवळे, उपमहापौर संजय मोहिते, सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, आर.के.पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी निमंत्रित मान्यवर आणि महाआघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.